'जगाने भारताच्या अण्वस्त्रांवर नजर ठेवावी'; इम्रान खान घाबरले

अण्वस्त्रांबाबतच्या धोरणावर परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चांगलेच घाबरले आहेत.

Updated: Aug 18, 2019, 11:30 PM IST
'जगाने भारताच्या अण्वस्त्रांवर नजर ठेवावी'; इम्रान खान घाबरले title=

इस्लामाबाद : अण्वस्त्रांबाबतच्या धोरणावर परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चांगलेच घाबरले आहेत. जगाने भारताच्या अण्वस्त्रांवर नजर ठेवावी, अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे. 'भारताची अण्वस्त्र ही सध्या हुकूमशाही, वंशवादी अशा मोदी सरकारच्या ताब्यात आहेत. याचा परिणाम फक्त इथल्या भागातच नाही तर जगभरात होणार आहे. त्यामुळे जगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे,' असं ट्विट इम्रान खान यांनी केलं आहे.

'मोदी सरकार हे पाकिस्तानच नाही, तर भारतातल्या अल्पसंख्याकांनाही धोकादायक आहे, आणि नेहरू-गांधींनी उभारलेल्या भारतालाही. नाझींची विचारधारा आणि आरएसएसच्या विचारधारेतलं साम्य बघण्यासाठी गुगल करा,' असं दुसरं ट्विट इम्रान खान यांनी केलं.

अण्वस्त्राचा आपणहून पहिले वापर करणार नसल्याच्या तत्वाशी भारत आतापर्यंत कटिबद्ध राहिला आहे. मात्र भविष्यात परिस्थिती पाहून याबाबतचा विचार केला जाईल, असं राजनाथ सिंग म्हणाले होते. यानंतर आता पाकिस्तानमधून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

युद्धजन्य स्थितीला सामोरं जाण्यास सज्ज आहोत. भारत हल्ला करण्याच्या तयारीत असेल, तर आम्हीही तयार आहोत, अशी दर्पोक्ती पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी केली आहे.