कोरोनामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच पृथ्वीवर इतकी शुद्ध हवा

कोरोनाचा असाही एक परिणाम

Updated: Apr 3, 2020, 05:59 PM IST
कोरोनामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच पृथ्वीवर इतकी शुद्ध हवा title=

मुंबई :  कोरोना विषाणूमुळे लाखो लोकांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पृथ्वीला मोठा दिलासा मिळाला आहे. पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे. अशी स्वच्छ हवा 75 वर्षानंतर पृथ्वीवर आढळते आहे. यापूर्वी, दुसर्‍या महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती.

शास्त्रज्ञांना असा दावा आहे की, दुसऱ्या महायुद्धानंतर ही पहिली वेळ असेल जेव्हा कार्बन उत्सर्जन पृथ्वीवर सर्वात कमी होत आहे. कोरोनामुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरात प्रदुषणाचं प्रमाण कमी झालं आहे. 

ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटलं की, यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ५ टक्के घट झाली आहे. याआधी  2008 च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झालं होतं. त्यामुळे 1.4 टक्के घट पाहायला मिळाली होती.

रॉब जॅक्सन यांनी म्हटलं की, दुसऱ्या महायुद्धात अनेक देश बंद होते, बाजार, वाहतूक, उद्योग संपूर्णपणे बंद होते. त्यामुळे प्रदुषण कमी झालं होत. त्यानंतर इतक्या वर्षांनी आज हे चित्र पाहायला मिळत आहे.

पण लॉकडाऊननंतर हीच परिस्थिती कायम राहणार नाहीये. पण सध्या तरी लोकांना शुद्ध हवा घ्यायला मिळत आहे. 

संयुक्त राष्ट्राने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 7.6 टक्के घसरण झाली तरच ग्लोबल वॉर्मिंगमध्ये 1.5 डिग्री सेल्सियसची कमतरता येईल.

वैज्ञानिकांच्या मते, कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कार्बन उत्सर्जनमध्ये 10 ते 20 टक्के घट झाली आहे. पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण 2021 च्या सुरुवातीला हे पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढायला लागतील.