दहशतवाद्यांच्या टार्गेटवर सफरचंद विक्रेते, राजस्थानी ट्रकचालकाची हत्या

जम्मू काश्मीर : आम्ही तर फळ विक्रेते आहोत, आम्हाला गोळी मारून कुणाचं भलं होईल 

Updated: Oct 16, 2019, 07:50 AM IST
दहशतवाद्यांच्या टार्गेटवर सफरचंद विक्रेते, राजस्थानी ट्रकचालकाची हत्या title=

मुंबई : श्रीनगरच्या शोपिया भागातील सिंधु शेरमल परिसरात दहशतवाद्यांनी राजस्थानच्या ट्रक ड्रायव्हरची गोळी मारून हत्या केली. ज्यानंतर दक्षिणी काश्मीर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांनी या घटनेबाबत निंदा व्यक्त केली आहे. 

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रक ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी 15 लोकांना चौकशीकरता ताब्यात घेतलं आहे. ही घटना सोमवारी रात्री 8 वाजता घडली आहे. जेव्हा सरफचंदांनी भरलेल्या ट्रकवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. ड्रायव्हरची हत्या केल्यानंतर त्या ट्रकला आग लावण्यात आली. 

ड्रायव्हरला तात्काळ स्थानिक रूग्णालयात दाखल केलं मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. मृतकाची ओळख राजस्थानमध्ये राहणारा शरीफ उददीन खान अशी झाली आहे. या घटनेनंतर तेथील परिसरातील फळ उत्पादकांमध्ये भीती पसरवली आहे. या घटनेनंतर संपूर्ण स्थिती ही तणावाची असून फळ विक्रेत्यांना टार्गेट केलं जात आहे. 

फळ विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार देशातील सर्व ठिकाणी सफरचंद पाठवणं ही आमची जबाबदारी आहे. कारण 5 ऑगस्टनंतर अनुच्छेद 370 काढून टाकण्याच्या अगोदरच काही लोकांकडून आधीच काही रक्कम घेतली होती. फळ विक्रेत्यांच म्हणणं आहे की, फळ उत्पादन करणं हे काही अनधिकृत आणि चुकीचं काम नाही आहे. ज्या करता आम्हाला टार्गेट केलं जातं आहे. 

काश्मीर खोऱ्यात केंद्र सरकार निर्बंध शिथिल करत असल्यामुळे दिवसेंदिवस जनजीवन पूर्ववत होत आहे. यात व्यापारी, स्थानिक दुकानदार, पर्यटन व्यवसाय आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत होत आहे. यामुळे संतापलेल्या दहशतवाद्यांवी आता सफरचंद बाग मालकांना, विक्रेत्यांना, ने -आण करणाऱ्या ट्रक चालकांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे.