Coronavrius: राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण; एकूण आकडा १२९७

गेल्या १२ ते १४ तासांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

Updated: Apr 9, 2020, 12:57 PM IST
Coronavrius: राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण; एकूण आकडा १२९७ title=

मुंबई: राज्यात गुरुवारी कोरोनाचे नवे १६२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १२९७ इतका झाला आहे. गेल्या १२ ते १४ तासांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील सर्वाधिक १४३ रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात ४, पुणे, औरंगाबादमध्ये प्रत्येकी ३, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर, यवतमाळ, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे. 

वरळीचं एनएससीआय स्टेडियम आता क्वारंटाईन वॉर्ड

या पार्श्वभूमीवर आता मुंबईत रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून या रॅपिड टेस्टसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने रॅपिड टेस्टसाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. केवळ केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या किटसवर अवलंबून न राहता मुंबई महानगरपालिका दक्षिण कोरियाकडून जवळपास १ लाख रॅपिट टेस्ट किटसची खरेदी करणार आहे. ही किटस् आल्यानंतर मुंबईतील वरळी आणि धारावी या हॉटस्पॉट असणाऱ्या भागांमध्ये रॅपिड टेस्ट केल्या जातील. 

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचं काय? विरोधकांसोबतच्या बैठकीत मोदी म्हणाले...

बारामतीत कोरोनाचा पहिला बळी
बारामती जिल्ह्यातील कोरोनाची लागण झालेल्या भाजीविक्रेत्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. या व्यक्तीला अर्धांगवायूचा त्रास होता. तसेच त्याची प्रतिकारशक्तीही बरीच कमी होती. हा बारामतीमधील कोरोनाचा पहिला बळी आहे. 

पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले
पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी विविध रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला. तर गुरूवारी सकाळी दोन मृत्यूची नोंद झाली. यात बारामतीमधील रुग्णाचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.