12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता 'या' वेळी पोहोचावं लागणार परीक्षा केंद्रावर

12 Board HSC Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने काही सूचना जारी केल्या आहेत.बोर्डाने ठरवून दिलेल्या वेळातच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागणार आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 14, 2024, 08:49 AM IST
12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता 'या' वेळी पोहोचावं लागणार परीक्षा केंद्रावर title=

HCS Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा फेब्रुवारी 21 पासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून 22 जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. आता या परीक्षेसंदर्भात बोर्डाने सूचना जारी केल्या आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. पेपर सुरू झाल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशा सूचना बोर्डाकडून प्रत्येक केंद्रांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रांवर जावे.

बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डातर्फे यंदा सरमिसळ पद्धत वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बारावीच्या परीक्षेवेळी एकामागे एक बसणार नाहीत. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे क्रमांक असणार आहेत. याआधी विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जायची. पण आता ही पद्धत बंद करून विद्यार्थ्यांना पेपरच्या शेवटी दहा मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. 

तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर, कॉम्प्युटर क्लास पेपर होईपर्यंत बंद राहतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. भाषा विषयाशिवाय इतर विषयांच्या पेपरसाठी बोर्डाने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल असे वेळापत्रक तयार केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेबद्दल कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळातर्फे करण्यात आलं आहे.

यासोबत ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी होईल, त्या केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढविला जाणार आहे. तसेच संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. जिल्हास्तरावर सात भरारी पथके तैनात असणार आहेत. परीक्षा केंद्रांच्या परिसरात कलम 144 लागू केले जाणार आहे.

विद्यार्थी संख्येत वाढ

दरवर्षी बारावीसाठी सुमारे 14 लाख 60 हजार विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी बारावीच्या 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी बारावीची विद्यार्थिसंख्या 15 लाख 15 हजार असल्याचे समोर आलं आहे.