नागपूर गुन्ह्याची राजधानी बनलीय, गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

 गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला

Updated: Jan 25, 2020, 06:54 PM IST
नागपूर गुन्ह्याची राजधानी बनलीय, गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला  title=

नागपूर : नागपूर गुन्ह्याची राजधानी बनली असून ही ओळख पुसण्याचे काम करणार असल्याचे म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. राज्यात औरंगाबाद,अमरावती आणि नागपूर शहराची नावे गुन्हे शहरात येतात तर देशात मुंबई, पुणे आणि नागपूरचे नाव येत असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांनी पत्र लिहून एसआयटीची मागणी केली. आमचा तपास सुरू आहे.अशात आम्हाला न विचारता अचानक एनआयएला तपास दिला. त्यांचे काही लोक अडचणीत येतील अशी केंद्रातील सरकारला अशी भीती आहे. म्हणून एनआयएला तपास दिला अशी शंका देशमुख यांनी व्यक्त केली. पण अशात राज्य शासन बघ्याची भूमिका घेणार नसल्याचे ते म्हणाले. 

विशेष तपास पथकाकडून (SIT) कोरेगाव-भीमा प्रकरणाची सखोल चौकशी झाली असती. केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करून राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे सोपविला. ही कृती राज्यघटनेच्या विरोधात आहे. काही जणांना वाचवण्यासाठीच केंद्राने हा तपास 'एनआयए'कडे दिल्याचा देशमुख यांनी केला.

भीमा कोरेगाव या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तारतम्य बाळगलेले नाही. त्यामुळे तपास होणे गरजेचे आहे. मात्र, त्यामधून सत्य बाहेर येईल म्हणून या प्रकरणाचा तपास घाईघाईने एनआयएकडे देण्यात आल्याचे काल (शुक्रवार) शरद पवारांनी म्हटले होते.

तसेच एल्गार परिषदेत अन्यायाविरुद्ध तीव्र शब्दांत व्यक्त करण्यात आलेल्या भावना म्हणजे नक्षलवाद नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोरेगाव-भीमा दंगलीनंतर विधानसभेत निवदेन दिले होते. त्यावेळी त्यांच्या निवेदनात माओवादी या शब्दाचा उल्लेख नव्हता, याकडे पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.