बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ, सुपाऱ्या टाकत चले जावच्या घोषणा

Beed Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्यातील बीडमध्ये आहेत. पण बीड शहरात आगमन होताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला.

राजीव कासले | Updated: Aug 9, 2024, 06:19 PM IST
बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ, सुपाऱ्या टाकत चले जावच्या घोषणा title=

Beed Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर गोंधळ घातला. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौरा करतायत. यात दोन दिवस ते बीड (Beed दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे बीड शहरात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलच्या बाहेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सुपारीबाज चले जाओ अशा घोषणा  ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करतात, त्यामुळे त्यांना जाब विचारायचा असल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या देखील टाकण्यात आल्या. 

राज ठाकरे हे लोकसभेनंतर आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलन शांततेत सुरू असताना याच्या विरोधात त्यांनी केलेले वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. राज ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

धाराशिवमध्येही झाला होता विरोध
याआधी धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) धाराशिवमध्ये आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी (Maratha) राडा घातला. मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती. मराठा आरक्षणावर त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती. पण राज ठाकरे यांनी भेट नाकराल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती.