अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर विरारमध्ये मोठी कारवाई

मिलिंद मोरेंना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मिलिंद मोरे यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...याप्रकरणी 15 ते 20 जणांवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

वनिता कांबळे | Updated: Jul 29, 2024, 04:53 PM IST
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर विरारमध्ये मोठी कारवाई title=

Virar Crime News : अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील एका रिसॉर्टमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी तथा ठाण्याचे शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांच्यावर हल्ला झाला. यानंतर  मिलिंद मोरे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारमध्ये मोठी कारवाई केली आहे. 

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉरेट्सवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्टस जमीनदोस्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. महानगरपालिकेच्या वतीने तातडीने ही तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र, उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचे काल दुःखद निधन झाले. काल आपल्या कुटूंबासह अर्नाळा बिच येथील रिसॉर्टवर गेले असता तिथे स्थानिक नागरिकांशी झालेल्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे अचानक हृदरविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचे दुःखद निधन झाले. ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी कुटूंबियाकडून झालेला प्रसंग समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन या भागातील सर्व अनधिकृत रिसॉर्टसवर हातोडा चालवण्याचे निर्देश वसई-विरार पालिका आयुक्तांना दिले. 

त्यानुसार या भागातील रिसॉर्टसवर कारवाई सुरू झाली असून काही रिसॉर्टसचे बांधकाम पालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले आहे. या भागात अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या या रिसॉरर्ट्सच्या विरोधात स्थानिक नागरिकानी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार करून ती बंद करावीत अशी मागणी केली होती. मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या रिसॉर्टसच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कारवाईला गती आली आहे. सकाळपासून पलिकेने या रिसॉर्टसह अनेक अनधिकृत रिसॉर्टसवर तोडक कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही चालु राहणार आहे.