'एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही केवळ....' उदय सामंत यांचं विधान

Uday Samant on Maharashtra CM Post: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याची चर्चा राज्यभरात झाली. दरम्यान शिवसेना नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 28, 2024, 03:12 PM IST
'एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही केवळ....' उदय सामंत यांचं विधान
उदय सामंत

Uday Samant on Maharashtra CM Post: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला. यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले. पण एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असे वाटत असताना मोदी-शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे त्यांनी सांगितले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याची चर्चा राज्यभरात झाली. दरम्यान शिवसेना नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाले सामंत? जाणून घेऊया.  

Add Zee News as a Preferred Source

काही गोष्टी गोपनीय 

2019 मध्येही महायुतीला चांगले बहुमत आले होती.सत्तेसाठी 35 दिवस आम्ही फिरत राहिलो.तेव्हा युती तुटली. संवेदनशील आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांनी युती कायम टिकावी यासाठी पाऊल उचलले. आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय, याचा आम्हाला गर्व असल्याचे सामंत म्हणाले. जनतेची इच्छा असली तरी अंतिम निर्णय हा मोदीसाहेब घेतील असं एकनाथ शिंदे बोलले. यामुळे विरोधकांची कोल्हेकुई थांबली आहे. विरोधी पक्षनेतेही बनवू न शकणाऱ्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर बोलू नये. मविआचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत,हे मी ठामपणे सांगतो.भविष्यात खासदारही संपर्कात येतील, असे ते म्हणाले. सरकार स्थापन होईपर्यंत काही गोष्टी गोपनीय ठेवल्या पाहिजेत.सस्पेन्स कायम ठेवूया, असे ते म्हणाले. 

'वडेट्टीवारही इकडे येतील'

मागच्या वेळी 35 दिवस अडकवून ठेवले. हिंदुह्रदयसम्राट उल्लेखही त्यांनी काँग्रेसच्या सांगण्यावरून केला नाही. धनुष्यबाण दिल्लीत ठेवलेला तो आम्ही आणला.गिरे तो भी टांग उपर या अवस्थेत राहू नका.उबाठा शिवसेनेची काँग्रेस झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या 2 टक्केही कर्तुत्व नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पक्ष वाढीच्या सूचना केल्या आहेत. त्याचे आत्मचिंतन करावे, अशी टिका त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केली.वडेट्टीवार हे शिंदे साहेब भेटल्यावर स्तुती करतात.केवळ पीसीमध्ये आम्हाला विरोधात बोलावे लागतंय म्हणतात. तेही इकडं येतील, असेही ते म्हणाले. 

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणे हा बाळासाहेबांचा अपमान आहे. सावकरांवर टीका करणा-यांबाबतची भूमिका त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट करावी, असे ते राऊतांना उद्देशून म्हणाले. 

 'केवळ निर्णयाचे अधिकार मोदींना दिलेयत'

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे असं म्हणता नाही येणार. केवळ निर्णयाचे अधिकार पंतप्रधान मोदींना दिलेयत, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More