आगाखान, अदनान सामी चालतात, मग शिवजयंती का नाही? Agra Fort मध्ये परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतापले

पुरातत्व विभागाने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास नकार दिल्यानंतर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान शिवजयंती साजरी करण्यास नकार दिल्याने शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.   

Updated: Feb 2, 2023, 12:53 PM IST
आगाखान, अदनान सामी चालतात, मग शिवजयंती का नाही? Agra Fort मध्ये परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतापले title=

Shivjayanti in Agra Fort of Delhi: आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्यासाठी दिल्ली हायकोर्टामध्ये (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी आग्र्याच्या किल्ल्यात (Agra Fort) शिवजयंती साजरी करता यावी यासाठी परवानगी मागितली होती. मात्र पुरातत्व विभागाने ही परवानगी देण्यास नकार दिला. या  किल्ल्यात याआधी आगाखान यांच्या संस्थेचा एक कार्यक्रम झाला आहे. तसंच अदनान सामी (Adnan Sami) यांच्याही संस्थेचा एक कार्यक्रम झाला आहे, मग शिवजयंतीला विरोध का? असा प्रश्न विनोद पाटील यांनी विचारला आहे. त्यामुळेच परवानगी मिळावी म्हणून त्यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 

आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे प्रयत्न सुरु होते. यासंबंधी पुरातत्व विभागाकडे याचिका करण्यात आली होती. मात्र वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पुरातत्व विभागाने शिवजयंती साजरी करण्यास नकार दिल्याने शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. 

विनोद पाटील यांचा संताप

आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच गायक अदनान सामीच्या कार्यक्रमालाही परवानगी देण्यात आली होती. यामुळे विनोद पाटील यांनी संताप व्यक्त केला असून ऐतिहासिक संबध नसणाऱ्यांना परवानगी दिली जाते. पण किल्ल्याच्या इतिहासाठी जोडले गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली जात आहे? अशी विचारणा केली आहे. 

पुरातत्व विभागाने परवानगी नाकारताना त्यामागील कारणाचा खुलासा केलेला नाही. सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्याबद्दल कोणतीही नियमावली नसताना पुरातत्व विभाग परवानगी नाकारत मनमानी कारभार करत असल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पार पडावा यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रयत्न केले होते. त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना शिफारस पत्र दिलं होतं. मात्र तरीही परवानगी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

महाराज आणि आग्र्यातून सुटका

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास (Chhatrapati Shivaji Maharaj) जेव्हा मांडला जातो तेव्हा आग्र्यातून झालेल्या ऐतिहासिक सुटकेचा उल्लेख असतो. औरंगजेबाने (Aurangzeb) छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंना आग्र्यात नजरकैदेत ठेवलं होतं. मात्र महाराजांनी मोठ्या चालाखीने औरंगजेबाच्या हातावर तुरी देत आपली सुटका करुन घेतली होती. त्यामुळे या किल्ल्यात शिवजयंती साजरी करत या ऐतिहासिक घटनेला पुन्हा उजाळा देण्याचा शिवप्रेमींचा मानस आहे. पण परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त असून आता हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष आहे.