कायदा तोडण्याचा आमचा अधिकार, कारण आम्ही मंत्री आहोत - नितीन गडकरी

नागपुरात बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे

Updated: Aug 9, 2022, 09:30 PM IST
कायदा तोडण्याचा आमचा अधिकार, कारण आम्ही मंत्री आहोत - नितीन गडकरी title=
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (PTI)

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कामाबरोबरच स्वभावामुळे त्यांचे विरोधकांकडूनही नेहमीच कौतुक करण्यात येतं. सरकारमधील त्रुटीबाबतही अनेकदा नितीन गडकरी हे खुलेपणाने भाष्य करतात. असेच काहीसं मत नितीन गडकरी यांनी नागपूरात (Nagpur) व्यक्त केलं आहे.

'महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’च्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी ‘ब्लॉसम’ नावाचा प्रकल्प सुरू केला. त्याचे उद्घाटन करताना नितीन गडकरी यांनी आम्ही मंत्री असल्याने गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा तोडण्याचा अधिकार असल्याचं मत व्यक्त केलं.

“मी महाराष्ट्रात १९९५ मध्ये मंत्री होतो. त्यावेळी मी अनेक रस्ते, पूल मुंबईत बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसं करताना अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे २,००० मुलांचा मृत्यू झाला. तेथील ४५० गावांना रस्ते नव्हते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितलं, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला. या भागात अनेक लोक मागासलेली होती. त्यामुळे वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला,” असे नितीन गडकरी म्हणाले.

"गरीबाचं कल्याण करण्यासाठी कुठलाही कायदा आडवा येत नाही. गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत,” असं नितीन गडकरींनी सांगितलं.

"मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही म्हणाल तसे सरकार चालणार नाही. तुम्ही फक्त यस सर म्हणायचं आम्ही म्हटलंय त्याची अंमलबजावणी करायची. आम्ही म्हणू तसं सरकार चालणार. त्या मी सगळे कायदे तोडून 450 गावे जोडली," असेही नितीन गडकरी म्हणाले.