भायखळ्यात एमआयएम विरुद्ध शिवसेना सामना रंगला

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भायखळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे

Updated: Oct 13, 2019, 10:03 PM IST
भायखळ्यात एमआयएम विरुद्ध शिवसेना सामना रंगला title=

देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. प्रत्येक उमेदवार मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ करताना पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या भायखळा विधानसभा मतदारसंघातही हेच चित्र आहे. यंदा या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भायखळा हा दक्षिण मुंबईतला एक महत्त्वाचा मतदारसंघ... यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भायखळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

एमआयएमकडून विद्यमान आमदार वारिस पठाण, शिवसेनेकडून मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव, काँग्रेसकडून माजी आमदार मधू चव्हाण, तर अखिल भारतीय सेनेकडून नगरसेविका गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

२०१४ मध्ये एम आय एम ला या मतदारसंघात लॉटरी लागली आणि वारिस पठाण निवडून आले. मात्र गेल्या पाच वर्षांत परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे वारिस पठाण यांना ही निवडणूक सोपी असणार नाही. कारण शिवसेनेनं या मतदारसंघात चांगलाच जोर लावला आहे.

गेल्या पाच वर्षांत रखडलेल्या विकासकामांमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा दावा माजी आमदार आणि काँग्रेस उमेदवार मधू चव्हाण यांनी केला आहे. तर बदल घडवण्यासाठी मैदानात उतरल्यानं जनता आपल्याला साथ देईल असा विश्वास, अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि उमेदवार गीता गवळींना आहे.

जुन्या चाळी आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न या मतदारसंघात आहे. तर मुस्लीम आणि मराठी मतदारांची संख्या या विभागात मोठी आहे. हे मतदार या विभागातले निर्णायक मतदार आहेत. धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा या मतदारसंघात प्रकर्षानं जाणवतो. त्यामुळेच इथे खरा सामना एमआयएम आणि शिवसेनेत रंगणार असा स्थानिकांचा अंदाज आहे.