महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करीत ट्विट केले आहे.

Updated: Apr 17, 2021, 03:17 PM IST
महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी; नवाब मलिकांचा गंभीर आरोप  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करुन दिली आहे.  

भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत असे ट्वीट करत नवाब मलिक यांनी केंद्रसरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे. 

हे उत्पादन करणार्‍या  ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्रसरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्रसरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे असेही नवाब मलिक म्हणाले. 

रेमडेसिवीर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान राज्यसरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे असे सांगितले आहे. 
हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या १६ निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

भाजप आमदार अतुल भातळखकर यांचे मलिकांना प्रत्युत्तर

रेमडेसिविर औषध बाबत ट्विट करता केंद्र सरकारवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप हा बेशरमपणा आणि खोटारडेपणाचा कळस आहे. त्यांनी पुरावे द्यावेत नाहीतर राजीनामा द्यावा, जनतेची माफी मागावी