ईडी माझ्या घरी आली तर मी स्वागत करेन, चौकशीला घाबरत नाही - नवाब मलिक

ईडीची छापेमारीवर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

Updated: Nov 11, 2021, 05:20 PM IST
ईडी माझ्या घरी आली तर मी स्वागत करेन, चौकशीला घाबरत नाही - नवाब मलिक title=

मुंबई : वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी 7 ठिकाणी ईडीकडून (Enforcement Directorate) धाडसत्र सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या. वक्फ बोर्ड (Waqf Board) राज्याचे अल्पसंख्यांक मत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अखत्यारीत येतो. यावर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले आहेत, अशी माहिती मिळाली, वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडलेले नाहीत, जी कार्यवाही होतेय ती पुण्यातील एक ट्रस्ट आहे ताबुद इनाम इंडोमेंट ट्रस्ट तालुका मुळशी, पुणे जिल्हा, जी वक्प बोर्डाकडे रजिस्टर आहे. 2009 मध्ये ही ट्रस्ट चॅरिट कमिशनकडून वक्फ बोर्डाकडे टान्सफर झाली अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात 1995 मध्ये जेव्हा लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा वक्फ कायदा लागू झाला. त्यानंतर जेवढ्या ट्रस्ट चॅरिटी कमिशनकडे रजिस्टर होत्या त्या ट्रस्टचं रजिस्ट्रेशन डीम रजिस्टर करण्याचा निर्णय चॅरिटी कमिशनरने घेतला. 

मी अल्पसंख्याक खातं हाती घेतल्यानंतर वक्फ बोर्डाच्या 10 सदस्यांची नियुक्ती केली. पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात पूर्ण बोर्ड तयार केलं आहे. कोणी तक्रार केली तर आम्ही चौकशी करतो, वक्फ कायद्यांतर्गत काम सुरु आहे. वक्फ बोर्डाने एका वर्षात 7 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात पुण्यातील ताबुत ट्रस्टचाही समावेश आहे. 

या सात गुन्ह्यात अनेक जणांना अटक झाली आहे, आष्टी इथल्या प्रकरणात एका उपजिल्हाधिकाऱ्यालाही अटक झाली आहे. मी खातं हाती घेतल्यानंतर क्लीन अप मोहिम सुरु केली आहे. आमच्या क्लीन अप मोहिमेला ईडीची साथ मिळतेय याचा आनंद आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

काही लोकांनी चालवलं की ईडी नवाब मलिक यांच्या घरापर्यंत पोहचली, ईडी घरापर्यंत आली तर त्यांचं स्वागत करेन, चौकशीली घाबरत नाही असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या कारवाईने नवाब मलिक यांना घाबवरलं जाईलं असं वाटतं, आम्ही ईडीला पूर्ण सहकार्य करु, अन्यायाविरोधात  लढाई मी सुरु केली आहे, त्यामुळे त्यांना वाटतं अशा बातम्या पेरून नवाब मलिकांना शांत केलं जाऊ शकतं, पण मी ईडीला विनंती करतो की त्यांनी वक्फ बोर्डाच्या इतर संस्थांचीही चौकशी करावी आम्ही सहकार्य करु असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

वक्फचा तपास नीट झाला तर भाजपचे लोक आत जातील, काही लोक हरियाणाला गेलेत ते आणि मुंबईतील काही लोक अडचणीत येतील असा गौप्यस्फोटही नवाब मलिक यांनी केला आहे.