शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ईडीकडून नोटीस (ED Notice) पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Updated: Sep 25, 2021, 09:29 AM IST
शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स  title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ईडीकडून नोटीस (ED Notice) पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. याआधी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना नोटीस पाठविण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने समन्स पाठविले असून त्यानुसार मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, अनिल परब चौकशीसाठी जाणार का, याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे, आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर परब यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. (ED summons Shiv Sena minister Anil Parab?)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Parab) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी त्यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. मात्र, हा दावा देशमुख यांनी फेटाळून लावला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने दिलेल्या जवाबावरून वसुली प्रकरणात चौकशी अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहेत. तसेच आरटीओ अधिकारी बजरंग खारमाटे यांची देखील चौकशी या पूर्वी झाली आहे. 

मनी लाँडरिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना  28 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. अनिल परब यांना एजन्सीने जारी केलेला हा दुसरा समन्स आहे. यापूर्वी, शिवसेना नेत्याला 31 ऑगस्ट रोजी बोलावले होते, परंतु त्यांनी लोकसेवक आणि महाराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काही वचनबद्धता दाखवून काही वेळ मागितला. या प्रकरणात निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याचे जबाब नोंदवल्यानंतर अनिल परब यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, त्यांचे हे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. गेले काही महिने माझ्यावर किरिट सोमय्या कुठलेही पुरावे नसताना आरोप करत आहेत. याबद्दल मी 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. यात माफी मागण्याचीही मागणी केली आहे. पुरावेही जोडले आहेत. यात मला न्याय मिळेल. मी चुकीचे काही केलेले नाही. मी न्यायमुर्तीचे काम हातात घेतलेले नाही. जसे किरिट सोमय्या हातात घेतात, असे परब यांनी सांगितले आहे.

बेछूट आरोप करून प्रतिमा मलिन केली जात आहे. प्रत्येकाला निवडणूक जिंकायची आहे. लोकांसमोर आम्ही कामे घेवून जाईल.यावेळीही सेनेवर लोक विश्वास ठेवतील, असे परब म्हणाले.