महाराष्ट्रात रंगला राजकीय 'शिमगा', फडणवीसांच्या 'मी परत येईन'ला पवारांचं 'येऊ देणार नाही'ने उत्तर

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला आता फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे

Updated: Mar 18, 2022, 05:40 PM IST
महाराष्ट्रात रंगला राजकीय 'शिमगा', फडणवीसांच्या 'मी परत येईन'ला पवारांचं 'येऊ देणार नाही'ने उत्तर title=

मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी 'मी पुन्हा येईन' असा विश्वास व्यक्त केला होता. भाजपचे (BJP) 105 आमदार निवडूनही आले. पण शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीची मोट बांधली आणि भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. आता चार राज्यांतल्या विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर भाजपनं पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार बनवण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  तर शरद पवार यांनीही भाजपचं हे आव्हान स्वीकारलं  आहे.

भाजपला रोखण्यासाठी पवारांची खलबतं 
'भाजपकडून होणा-या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही...'  असं शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांच्या बैठकीत गुरुवारी सांगितलं. भाजप राजकीय प्रतिस्पर्धी असला तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. परिश्रम घेण्याची तयारी आणि नियोजन त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.

गुरूवारी संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत पवारांची बैठक झाली. या बैठकीतही विधिमंडळात भाजपला आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय झाल्याचं समजतंय. दुसरीकडे भाजपनंही शरद पवार यांना प्रतिआव्हान दिलं आहे. 

भाजपचं शरद पवार यांना प्रतिआव्हान
चार राज्यातल्या यशानंतर भाजपला दहा हत्तींचं बळ आलंय...त्यात गोव्यात भाजपचं सरकार आणण्यात फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे फडणवीसांचा आत्मविश्वास दुणावला आहे. गोवा निवडणुकीत भाजपाला यश मिळवून देणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी 'गोवा तो एक झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है' म्हणत महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणणारच असा निर्धार व्यक्त केला.

महाराष्ट्रातही आता परिवर्तनाची लाट सुरु झाली आहे. सरकारच्या भ्रष्ट्राचारविरोधी लढ्यात आता भाजपसोबत जनताही उतरली आहे. आम्ही सरकारचा भ्रष्ट्राचारी बुरखा टराटरा फाडत आहोत. हे सरकार महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे असा घणघाती आरोप फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस विरुद्ध पवार
भाजपच्या महत्त्वाकांक्षेला रोखण्याचा विडा पुन्हा एकदा पवारांनी उचलला आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा फडणवीस विरूद्ध पवारांमध्ये राजकीय आखाडा रंगणार हे नक्की.