'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत', रोहित पवार यांचा विरोधकांना टोला

'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचे प्रतीत होते आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी लगावला आहे.  

Updated: Mar 23, 2021, 07:49 AM IST
'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत', रोहित पवार यांचा विरोधकांना टोला title=
संग्रहित छाया

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी रुग्णालामध्ये दिलेल्या 'प्रेस बाईट'चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात 'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचे प्रतीत होते आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय  होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल, असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांना सल्ला

गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. दरम्यान, अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आरोप असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा, असे रोहित पवार म्हणाले.

'महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल'

महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. तर दुसरीकडे संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या  गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिले, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला?

Image

एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते, म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे. हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित करत उचलबांगडी केलेल परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

हा (परमबीर सिंग)अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे, असे रोहित पवार म्हणाले.

'मूलभूत प्रश्न बाजूला पडू नयेत'

हा सगळा प्रकार आणि गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता मार्क ट्वेनच्या 'सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं', या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो. काही महिन्यांपूर्वीही सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव खेळण्यात आला, परंतु त्या ठिकाणीही सत्य समोर आलंच. या प्रकरणीही सत्य समोर येईलच, परंतु या सर्व घडामोडींमध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडू नयेत हिच अपेक्षा, असे रोहित म्हणाले.