पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याच्या आश्वासनाचे काय झाले?- संजय राऊत

मोदींनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?

Updated: Sep 8, 2018, 05:50 PM IST
पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याच्या आश्वासनाचे काय झाले?- संजय राऊत title=

मुंबई: पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. इतके होऊनही केंद्र सरकारने चोख प्रत्युत्तर न दिल्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पाकव्याप्त काश्मीरला भारतात आणू, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे काय झाले, याचे उत्तर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी दिले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले. 

पाकिस्तानी सैनिकांनी सीमेवर सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ, असे कमार जावेद बाजवा यांनी म्हटले होते. त्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. मात्र, सरकारकडून यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नव्हते. 

सरकारला सत्तेत होऊन आता पाच वर्ष पूर्ण होत आली. मागच्या निवडणुकीत मते मागताना तुम्ही काश्मीरविषयी आश्वासन दिले होते. त्यावेळी तुमच्या आश्वासनाला लोकांनी टाळ्याही वाजवल्या होत्या. त्या आश्वासनाचे काय झाले?. पाकसोबत बोलीने नव्हे तर गोळीने व्यवहार करायला हवा, असा सवाल राऊत यांनी विचारला.