Govt Jobs : 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा; सरकारने नेमलेल्या कंपन्या परीक्षा घेण्यास सक्षम नाहीत

सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सरकारने ज्या कंपन्यांना ऑनलाईन परीक्षा घेण्याची जबाबदारी दिलीय त्या कंपन्यांची लाखो उमेदवारांची परीक्षा घेण्याची क्षमताच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

Updated: Jan 10, 2023, 09:21 PM IST
Govt Jobs : 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा; सरकारने नेमलेल्या कंपन्या परीक्षा घेण्यास सक्षम नाहीत title=

Maharashtra Govt Jobs 2023 : राज्यात 75 हजार सरकारी पदभरतीची करण्याची घोषणा राज्य सरकारने जाहीर केली होती. सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सरकारने ज्या कंपन्यांना ऑनलाईन परीक्षा घेण्याची जबाबदारी दिलीय त्या कंपन्यांची लाखो उमेदवारांची परीक्षा घेण्याची क्षमताच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे(Maharashtra Govt Jobs 2023).

भंडारा जिल्हा परीषदेसाठी जिल्ह्यात सेंटर नसल्याचं या कंपन्यांनी कळवले. तसंच मोठ्या प्रमाणावर एकावेळी पदभरती करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. जिल्हा परिषदेनं आता हा अहवाल सरकारला दिला आहे.  परीक्षेत गैरव्यवहार होऊ नये यासाठी सरकारने TCS आणि IBPS या नावाजलेल्या कंपन्यांमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, 75 हजार पदभरतीसाठी 15 लाखांपेक्षा जास्त उमेदवार अर्ज करू शकतात. लाखोंचे अर्ज आल्यास एवढ्या उमेदवारांची परीक्षा घेण्यास या दोन्ही कंपन्या सक्षम नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दीड वर्षांपूर्वी राज्यातील आरोग्य सेवा परिक्षा व म्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले होते. या परीक्षांमध्ये मोठा घोटाळा झाला होता. या घोटाळ्यानंतर या परीक्षा टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांनमार्फत घेण्याचा निर्णय तत्कालीन ठाकरे सरकारने घेतला होता. 10 पदांसाठी  एकच संयुक्त पुर्व परीक्षा घेण्याचा ही निर्णय झाला.

महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त सेवा पुर्व परीक्षा नावाने एकच परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणार असल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला.

मात्र, आता  सरकारने TCS आणि IBPS या नावाजलेल्या कंपन्यांच्य क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे आता ही भरती प्रक्रिया पुन्हा लाबंणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना महामारीमुळे सरकारली नोकर भरती प्रक्रियेला ब्रेक मिळाला आहे. राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे फडणवीस सरकारककडून गती देण्याच्या प्रयत्न केला जात आहे. त्यातच आता ही धक्कादायक माहित समोर आल्याने पुन्हा एकदा भरती प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. अनेक तरुण हे MPSC तसेच सरकारी नोकर भरती परीक्षेची तयारी करत आहेत. यामुळे या बातमीने त्यांची चिंता वाढवली आहे.