कोरोनाच्या संकटानंतर वीकेंड होमची मागणी वाढणार

सुरक्षित घरांसाठीचा पर्याय म्हणून विचार

Updated: Jun 17, 2020, 05:11 PM IST
कोरोनाच्या संकटानंतर वीकेंड होमची मागणी वाढणार title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना काळात ठप्प असलेल्या गृहउद्योग व्यवसायाचं भवितव्य कसं असेल, याबद्दल प्रचंड चिंता व्यक्त होत असताना आता गृहनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरस नंतरच्या काळात जगात वीकेंड होमना प्रचंड मागणी असेल, असा निष्कर्ष INMASO या संस्थेने केलेल्या अभ्यासातून निघाला आहे. 

कोरोनासारखं संकट पुन्हा आल्यास एक सुरक्षित जागा म्हणून लोक या वीकेंड होमचा विचार करतील, असंही या अहवालात स्षष्ट करण्यात आलं आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे कोरोनानंतर मुंबई महानगर प्रदेशात १.८० लाख आणि पुणे महानगर प्रदेशात ५४ हजार वीकेंड होमची मागणी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

INMASO ही संस्था गेली १५ वर्षं बांधकाम क्षेत्रात सल्लागार म्हणून काम बघत आहे. कोरोनाच्या संकटाची मोठी झळ सध्या बांधकाम उद्योगाला बसली आहे. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून पूर्ण झालेल्या प्रकल्पांना गिऱ्हाईक मिळणे कठीण झाले आहे. मोठ्या शहरांमधून मजुरांचं स्थलांतर झाल्यानेही अनेक प्रकल्प रखडले आहेत. अशा परिस्थितीत बांधकाम व्यावसायिक सरकारकडे मोठ्या आशेने बघत आहेत. 

या पार्श्वभूमीवर INMASO या संस्थेने केलेल्या या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कोरोनाचं संकट टळल्यानंतर लोकांचा ओढा वीकेंड होम खरेदीकडे असेल. या निष्कर्षाला पुष्टी देणारी काही निरीक्षणंही या अहवालात नोंदवण्यात आली आहेत. यापूर्वी वीकेंड होम म्हणजे एक महत्त्वाकांक्षा किंवा स्वप्नपूर्ती या दृष्टीने बघितले जात होते. पण कोरोनाच्या काळात शहरांमध्ये राहणं धोकादायक ठरल्याचं सिद्ध झाल्यानंतर आता वीकेंड होम ही गरज बनले, असं मत या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

शहराजवळ पण निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं आणि इंटरनेची चांगली सुविधा असलेलं वीकेंड घर हे आता नेहमीच्या घराला पर्याय बनू शकेल, असं हा अहवाल म्हणतो. त्याशिवाय कोरोनामुळे पर्यटन व्यवसायावर आलेली संक्रांत पाहता पुढल्या काही काळात लोक पर्यटनासाठी बाहेर पडणे अशक्य आहे. अशा वेळी वीकेंड होम हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असंही या अहवालात नमूद केलं आहे. तसंच या ग्राहकांकडून प्लॉट विकत घेतले जाण्यापेक्षा अपार्टमेंट किंवा व्हिला घेतल्या जातील, असा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे.

 

या अभ्यासानुसार मुंबई-पुण्याजवळ खंडाळा, लोणावळा, इगतपुरी, मुरबाड, अलिबाग, कर्जत, तळेगाव, खोपोली-पाली रोड, वाडा, डहाणू अशा ठिकाणी घरांची मागणी वाढेल. मुंबई महानगर प्रदेशात ही मागणी १.८० लाखांच्या घरात असेल, तर पुण्यात साधारण ५४,००० ग्राहक वीकेंड होममध्ये पैसे गुंतवतील, असा अंदाजहीसंतोष नाईक, संस्थापक INMASO यांनी  या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.