गणेशोत्सव : संभाजीनगर टू मुंबई व्हाया हैदराबाद

गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे भक्तीचा अनोखा उत्सव. आपल्या लाडक्या दैवताच्या भक्तीत भक्त या काळात दंग होतात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 22, 2012, 07:39 PM IST

संतोष गोरे
वरील शिर्षक वाचून चाणाक्ष वाचकांनी हा लेख तीन शहरातल्या गणेशोत्सवावर आहे, हे ओळखलं असेलच. (अर्थात ओळखू येऊ नये, इतकं ते अवघडही नव्हतं) गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे भक्तीचा अनोखा उत्सव. आपल्या लाडक्या दैवताच्या भक्तीत भक्त या काळात दंग होतात. संभाजीनगरला माझ्या लहानपणापासून गणपतीचं आगमन होतं. गणपतीच्या आरतीसाठी फूलं आणि दूर्वा आणण्यातला आनंद आणि उत्साह अवर्णनीय असाच असायचा. माझ्या लहानपणी संभाजीनगरला गणेशोत्सवात मेळे चांगलेच भरायचे. अर्थात तेव्हा मेळे शेवटच्या घटका मोजत होते. आता तर बहुतेक मेळे हा प्रकारच बंद पडल्यात जमा आहे. मी स्वत: सातवीत असताना तर माझा लहाना भाऊ पाचवीत असताना या मेळ्यात सहभागी झालो होतो. या मेळ्यांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जायचा. या माध्यमातून माझं रंगभूमीवर पदार्पण झालं. मग काही शालेय नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्याचा शेवटही झाला. मात्र माझा भाऊ रवींद्र याने मेळ्यात आलेल्या स्टेज डेअरिंगचा फायदा घेत शालेय व महाविद्यालयीन आयुष्यात वक्तृत्व आणि वाद-विवादाच्या क्षेत्रात चांगलंच नाव कमावलं. मेळा, वक्तृत्व आणि आता वकिली या मार्गाने त्याचा प्रवास झाला. गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी आई-वडिलांबरोबर जाण्याची गंमतच निराळी होती. शहागंज मधली गणेशोत्सवाची लाईटिंग पाहण्यासाठी गर्दी व्हायची. गुलमंडीवरही आकर्षक लाईटिंग असायची. गुलमंडीवर गेल्यावर उत्तम मिठाई भांडारमधली इम्रती खाल्ल्याशिवाय पाय निघायचा नाही.
लहानपणी केबल वाहिन्या नसल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गल्लीत व्हिडीओवरील चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. नगिना, त्रिदेव, तिरंगा, राम लखन, अशी ही बनवाबनवी असे अनेक चित्रपट तेव्हा तुफान जल्लोषात पाहिले.
शालेय जीवनानंतर अकरावीत गेल्यावर मी आमच्या भागातल्या सर्वोदय गणेश मंडळाचा कार्यकर्ता झालो. हे १९९४ हे वर्ष होतं. त्यावेळी आम्ही घरोघरी जावून वर्गणी गोळा केली. मंडळाला स्वत:चं झांज आणि ढोल पथक स्थापन करायचं होतं. मात्र जमा झालेली वर्गणी आणि होणारा एकूण खर्च यांचा काही मेळ बसत नव्हता. त्यावर आमची माथापच्ची सुरू होती. यामुळे वैतागलेला आमचा एक सहकारी गुलचंद याने `काय ती झांज, अन काय ते धंदे`, असा अफलातून डायलॉग मारला. आणि या डायलॉगमुळे तणाव नाहीसा झाला आणि सगळेच हसायला लागले. आता तर गुलचंदचा १९९४ मधला डायलॉग दरवर्षी आठवला जातो. मंडळातले सगळेच जुने सहकारी म्हणजेच विलास गायकवाड, सुरेश गायकवाड, राजू शिंदे, गजानन लंबे, किरण हडदगुणे, सतीष निकम, बबलू त्रिवेदी आताही संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवात दंग झाले आहेत. संभाजीनगरात जल्लोषात निघणारी विसर्जन मिरवणूक अजूनही स्मरणात आहे.
२००३ मध्ये नोकरीच्या निमित्तानं हैदराबादला गेलो. तिथंही मोठ्या धडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो. रामोजी फिल्म सिटीतल्या ई टीव्हीमध्ये तेव्हा गणेशोत्सव होत नव्हता. २००४ मध्ये ई टीव्ही मराठी प्रोग्रामिंगच्या समीर भोळे, रघुनंदन बर्वे, राज साळोखे, विजय गालफाडे आणि अर्थात मीही होतोच... यांच्या पुढाकाराने फिल्मसिटीतल्या आलमपनाहमध्ये कोजागिरीच्या दिवशी ‘चांदरात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेव्हा मी प्रोग्रामिंग डिपार्टमेंटमध्ये होतो. त्यानंतर गणेशोत्सवाच्या ई टीव्हीच्या न्यूज डेस्कवर गणेश महाराज विराजमान झाले. विसर्जनानंतर पुन्हा कार्यक्रम ठेवण्यात आला. सर्व सहका-यांनी हिंदी - मराठी गीतांवर तुफान डान्स केला. या कार्यक्रमानंतर एका महिन्यात माझी न्यूज डिपार्टमेंटमध्ये बदली झाली. ही सर्व गणेशाची कृपा, असं मत सर्व सहकाऱ्यांनी व्यक्त केलं. त्यानंतरचा २००५ आणि २००६चा गणेशोत्सव तर कधीच विसरणार नाही, असा झाला. या दोन्ही वर्षी सगळ्या सहका-यांच्या केलेल्या नकला आणि मारलेले `मार्मिक पंच` अजूनही लक्षात आहेत. गणेशोत्सवाच्या काळात डेस्कवर मोठा उत्साह असायचा सकाळ - संध्याकाळ आरती चुकायची नाही. सजावट करण्यासाठीही सहका-यांचा उत्साह असायचा. गणेशोत्सवाच्या काळात माझं नकला करण्यासाठीचं स्क्रिप्टींग सुरू असायचं आणि मग कार्यक्रमाच्या दिवशी दणादण फटाके फुटायचे.
कार्यक्रमाचा शेवट हा सामूहिक नृत्यानं व्हायचा. त्याची तर सगळेच वाट बघायचे. त्यात एकेकाचं पदलालित्य म्हणजे अफलातून असंच असायचं. २००७ चा गणेशोत्सव अमरावतीत साजरा झाला. बातमी आणि गणेशोत्सव दोन्हीही एकाच वेळी झाले.

२००८ पासून मुंबईतल्या गणेशोत्सवा