'या' खेळाडूमुळे 'कुलचा' जोडी तुटली, लेग स्पीनरचा खुलासा

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकी जोडीला क्रिकेट वर्तुळात 'कुलचा' म्हणून ओळखलं जातं.  

Updated: May 21, 2021, 06:20 PM IST
 'या' खेळाडूमुळे 'कुलचा' जोडी तुटली, लेग स्पीनरचा खुलासा title=

मुंबई : कुलदीप यादव (Kuldeep Yadav)  आणि (Yuzvendra Chahal) युजवेंद्र चहल. टीम इंडियाचे  (Indian Cricket Team)  फिरकी गोलंदाज. या फिरकी जोडीला क्रिकेट वर्तुळात 'कुलचा' म्हणून ओळखलं जातं. काही वर्षांपूर्वी ही फिरकी जोडी एकत्र खेळायची. या जोडीने फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना नाचवलं. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे दोघे एकत्र खेळले नाहीत. हे दोघे अखेरचे 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध खेळले होते. या सामन्यात या दोघांनी 20 ओव्हरमध्ये 160 धावा लुटल्या होत्या. तेव्हापासून ही जोडी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळली नाही. युजवेंद्र चहलने कुलचा जोडी तुटण्यामागे टीम इंडियाच्या खेळाडूला जबाबदार ठरवलं आहे. चहलने याबाबत खुलासा केला आहे. जाडेजाने संघात स्थान मिळवलं आहे. जाडेजा स्पिनर ऑलराऊंडर आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पिनरची केवळ एकच जागा शिल्लक आहे. यामुळे चहल किंवा कुलदीप या दोघांपैकी कोणा एकालाच संधी मिळते. (Due to Ravindra Jadeja Kulcha pair broke up, says Yujvendra Chahal)

जाडेजा काय म्हणाला?  

"जेव्हा मी आणि कुलदीप एकत्र खेळायचो, तेव्हा हार्दिक पंड्याही बॉलिंग करायचा. दुर्देवाने 2018 मध्ये हार्दिकला दुखापत झाली. ही दुखापत जाडेजाच्या पथ्यावर पडली. यामुळे जाडेजाला हार्दिकच्या जागी अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान मिळालं. जाडेजा बॅटिंगही करतो. जाडेजा दुर्देवाने स्पिनर आहे. जाडेजा जर वेगवान गोलंदाज असता तर, मी आणि कुलदीप एकत्र खेळलो असतो", असं चहल म्हणाला. चहल इंडिया टुडेसोबत बोलत होता. यावेळस त्याने कुलचा जोडीबाबत खुलासा केला.   

"कुलदीप आणि मी प्रत्येक मालिकेतील निम्मे सामने खेळतो. कुलदीप अनेकदा 5 सामन्यांच्या मालिकेत 3 मॅचमध्ये खेळतो. मला सुद्धा खेळण्याची संधी मिळते. हार्दिक जेव्हा पर्यंत टीममध्ये होता, तो पर्यंत आम्हा दोघांना संधी मिळत होती. पण टीमला 7 व्या क्रमांकावर ऑलराऊंडरची आवश्यकता होती. टीम इंडिया सातत्याने जिंकतेय. आम्हाला संधी मिळो न मिळो, आम्ही जिंकतोय. त्यामुळे आम्ही दोघे एकत्र खेळत नसल्याचं मला अजिबात वाईट वाटत नाही", असंही चहलने स्पष्ट केलं.  

जाडेजाची शानदार कामगिरी

जाडेजा गेल्या काही वर्षांपासून टेस्ट, वनडे आणि टी 20 या तिनही फॉर्मेटमध्ये ऑलराऊंड कामगिरी करतोय. जाडेजा बॉलिंगसह निर्णायक क्षणी शानदार बॅटिंगही करतो. जाडेजामध्ये एकहाती सामना पलटवण्याची क्षमता आहे. त्याने अनेकदा टीम इंडिया मॅच जिंकून दिली आहे. जाडेजा बॅटिंग, बॉलिंगसह धमाकेदार फिल्डिंगही करतो. जाडेजा फिल्डिंगने प्रत्येक सामन्यात किमान 2-3 धावा वाचवतो. त्याच्या या ऑलराऊंड कामिगरीमुळे त्याने संघात आपले स्थान कायम केलं आहे.