भारताचा कर्णधार-उपकर्णधार आमने-सामने, आयपीएलमध्ये टिकण्याचं आव्हान

आयपीएलमध्ये लागोपाठ पराभवाचे झटके बसलेल्या बंगळुरू आणि मुंबईच्या टीम आज आमने-सामने असतील.

Updated: May 1, 2018, 06:00 PM IST
भारताचा कर्णधार-उपकर्णधार आमने-सामने, आयपीएलमध्ये टिकण्याचं आव्हान title=

बंगळुरू : आयपीएलमध्ये लागोपाठ पराभवाचे झटके बसलेल्या बंगळुरू आणि मुंबईच्या टीम आज आमने-सामने असतील. ही मॅच जिंकून प्ले ऑफमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी या दोन्ही टीम मैदानात उतरतील. ही मॅच हरणाऱ्या टीमसाठी मात्र प्ले ऑफसाठी क्वालिफाय करणं आणखी कठीण होऊन बसणार आहे. मागच्या मॅचमध्ये चेन्नईसारख्या तगड्या टीमचा पराभव केल्यामुळे मुंबईचं मनोबल उंचावलं असेल. तर बंगळुरूला मात्र कोलकात्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबई आणि बंगळुरूनं आत्तापर्यंत खेळलेल्या 7 मॅचपैकी 2 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे. पण नेट रनरेट चांगला असल्यामुळे मुंबईची टीम सहाव्या आणि बंगळुरूची टीम सातव्या क्रमांकावर आहे.

मुंबईचं पारडं जड

बंगळुरूविरुद्धच्या या मॅचमध्ये मुंबईचं पारडं जड आहे. यावर्षी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आधीच्या मॅचमध्ये मुंबईनं बंगळुरूचा तब्बल 46 रननी पराभव केला होता. तर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबईचं रेकॉर्ड चांगलं आहे. मुंबईत झालेल्या या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि एव्हिन लुईसनं अर्धशतक केलं होतं.

सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये

मुंबईचा ओपनर सूर्यकुमार यादव हा सध्या फॉर्ममध्ये आहे. यादवनं 7 मॅचमध्ये 274 रन केल्या आहेत. पण मुंबईच्या इतर बॅट्समनना फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माला 7 पैकी 5 मॅचमध्ये 20 पेक्षा अधिक स्कोअर करता आलेला नाही.