IPL 2020 : सुपर से उपर! अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूची मुंबईवर मात

सामना जवळपास निसटलेला असतानाच....  

Updated: Sep 29, 2020, 12:01 AM IST
IPL 2020 : सुपर से उपर! अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूची मुंबईवर मात   title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  आयपीएलच्या IPL 2020 यंदाच्या हंगामातील दहाव्या सामन्याच बंगळुरू आणि मुंबई असे दोन तगडे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या 'विराट'सेनेनं २० षटकांमध्ये ३ गडी बाद २०१ धावा केल्या. 

बंगळुरुनं दिलेलं हे लक्ष्य स्वीकारत मुंबईनं काहीशी संथ सुरुवात करत अखेरच्या काही षटकांमध्ये वेगवान खेळी केली. ज्यामध्ये ४ गडी गमावत संघानं २०१ धावा केल्या. बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात करत मुंबईच्या संघाला काहीसं मागे टाकण्याचा प्रयत्न केला. किंबहुना बंगळुरूच्या गोलंदाजांना यात यशही आलं. पण, चौथा खेळाडू तंबूत परतल्यानंतरही मुंबईच्या खेळाडूंची जिद्द संपली नाहीय पाचव्या स्थानावर आलेल्या कायरन पोलार्डनं ईशान किशनच्या साथीनं मैदानात चौफेर फटकेबाजीनं खऱ्या अर्थानं मुंबईला या सामन्यात तग धरुन ठेवण्यास मदत केली. 

चौकार आणि षटकारांची बरसात करत पाहता पाहता किशन आणि पोलार्डनं मुंबईच्या संघावरचं सामन्यावरील पकड सुटण्याचं ओझं हलकं केलं. शतकापासून अवघी एक धाव मागे असतानाच इशान किशननं आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा हा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. ९९ वेगवान धावांचा डोंगर रचून आणि विराट सेनेला घाम फोडून किशन परतला. तर, इथं शेवटच्या चेंडूवर चौकार मारत पोलार्डनं हा सामना सुपओव्हरमध्ये नेऊन ठेवला. 

बंगळुरू- मुंबई हा सामना सुरु होण्यापूर्वी जी उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळाली होती ती सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत सार्थ ठरली. सुपर ओव्रहसाठी मुंबईकडून पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानात आले. तर, बंगळुरूकडून हे षटक टाकण्याची जबाबदारी नवदीप सैनीला देण्यात आली. पहिल्या तिन्ही चेंडूंमध्ये मोठे फटके मारण्यात मुंबईच्या दोन्ही खेळाडूंना यश आलं नाही. चौकाराची भर टाकल्यानंतर याच षटकातील पाचव्या चेंडूवर पोलार्ड pollard झेलबाद झाला. तर, अखेरच्या चेंडूवर हार्दिकलाही दमदार फटका मारता आला नाही. तगडं आव्हान देण्याचा मनसुबा असणाऱ्या मुंबईच्या संघानं सुपरओव्हरमध्ये अवघ्या ७ धावा केल्या. 

 

८ धावांच्या आव्हानासह बंगळुरूकडून एबी डिविलियर्स आणि विराटनं मैदान गाठलं. मुंबईच्या जसप्रीत बुमराहनं अतिशय अटीतटीच्या सामन्यातील सुपरओव्हचं षटक टाकण्याचं आव्हान पेललं. ज्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर यष्टीरक्षकाच्या हातून झेलबाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. पण, त्यानंतर रिव्ह्यू घेत हा निर्णय बदलून डिविलियर्ला बिनबाद घोषित करण्यात आलं. पुढच्याच चेंडूवर त्यानं जोरदार फटका मारत चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवला. शब्दश: श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यातील अखेरच्या चेंडूवर बंगळुरूच्या संघाला एक धाव आवश्यक असतानाच विजयी चौकार मारत विराट कोहलीनं संघाला या सामन्यात यश मिळवून दिलं आणि मुंबईच्या संघावर मात केली. मुंबईनं सामना गमावला असला तरीही पोलार्ड आणि किशनच्या फलंदाजीची क्रीडारसिकांनी प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं.