'हार्दिक परतल्याने बुमराहला वाईट वाटलं असावं कारण..'; श्रीकांत यांचा MI मधील वादाकडे इशारा

Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या लिलावाआधी हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघात सहभागी झाला आहे. याचदरम्यान बुमराहची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 30, 2023, 11:26 AM IST
'हार्दिक परतल्याने बुमराहला वाईट वाटलं असावं कारण..'; श्रीकांत यांचा MI मधील वादाकडे इशारा title=
मुंबईच्या संघात अंतर्गत कलह सुरु असल्याच्या चर्चा

Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णामाचारी श्रीकांत यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल भाष्य केलं आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतल्याने जसप्रीत बुमराह दुखावला गेला असेल असं मत श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे. आयपीएल 2024 च्या लिलावाआधी मुंबईने थेट गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला 15 कोटींच्या ऑल कॅश डीलमध्ये पुन्हा आपल्या संघात सहभागी करुन घेतलं. यानंतर काही वेळातच जसप्रीत बुमराहने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केलेल्या एका पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर श्रीकांत यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

दोघांनी एकत्र सुरु केलं करिअर

बुमराह आणि हार्दिक या दोघांनी 2015 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघातून आपल्या करिअरची सुरुवात केली. भारतीय संघामध्ये संधी मिळण्याआधीच हे दोघे मुंबई इंडियन्सच्या कोअर टीमचा भाग झाले. 2022 च्या लिलावाआधी बुमराहला मुंबईच्या संघाने रिटेन केलं. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याला मुंबईने करार मुक्त केलं. हार्दिककडे नव्याने आयपीएलमध्ये सहभागी होत असलेल्या गुजरात टायटन्स संघाचं नेतृ्त्व सोपवण्यात आलं. गुजरातचा संघ 2022 ला आयपीएलचा चषक जिंकला तर 2023 मध्ये गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पुन्हा मुंबईच्या संघात दाखल झाला असून त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं जाईल अशीही चर्चा सुरु झाली आहे. या साऱ्या घडामोडीदरम्यान जसप्रीत बुमराहने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून, "काहीवेळेस गप्प रहाणे हेच सर्वोत्तम उत्तर असतं," अशी पोस्ट शेअर केली. त्यामुळे हार्दिकच्या येण्याने बुमराह नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. रोहित शर्मानंतर कर्णधार होण्याचं बुमराहचं स्वप्न हार्दिक संघात आल्याने धुळीस मिळाल्याने तो नाराज असल्याचंही बोललं गेलं. काहींनी तर बुमराह मुंबईचा संघ सोडेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे.

श्रीकांत म्हणतात, बुमराहला ते पटलं नसावं

आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना श्रीकांत यांनी हार्दीक पंड्याला मुंबईच्या संघात पुन्हा सहभागी करुन घेण्याच्या निर्णय बुमराहला रुचला नसेल असं म्हटलं. आपल्यासारखा खेळाडू संपूर्ण आयपीएल करिअरमध्ये मुंबईच्या संघाबरोबर राहिलो आहोत. असं असताना पंड्या पुन्हा मुंबईत येण्याचं एवढं सेलिब्रेशन बुमराहला पटलं नसावं, असंही श्रीकांत यांनी म्हटलं आहे.

त्याला वाईट वाटलं असेल

"तुम्हाला जसप्रीत बुमराहसारखा दुसरा क्रिकेटपटू सापडणार नाही. कसोटी असो किंवा व्हाइट बॉल क्रिकेट असो तो सर्वोत्तम आहे. त्याने वर्ल्ड कपमध्येही भन्नाट कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या 2022 च्या पाचव्या कसोटीमध्ये बुमराह हा कर्णधार होता. त्याचं त्याला वाईट वाटलं असेल. त्याला मुंबईच्या संघाच्या निर्णयाचं वाईट वाटलं असणार. आपण मुंबईमध्ये कायम राहिलो पण आता संघ सोडून गेलेला परत आल्याचं एवढं सेलिब्रेशन होतं आहे, हे त्याला खटकलं असावं," असं श्रीकांत म्हणाले.

नक्की वाचा >> 'कर्णधारपदाबरोबर निष्ठा...'; गुजरातचा कॅप्टन होताच गिलचा मुंबईत गेलेल्या हार्दिकला टोला?

एकत्र बसून बोलण्याचा सल्ला

श्रीकांत यांनी रविंद्र जडेजाबरोबर चेन्नई सुपरकिंग्जमध्ये असं झालं होतं अशी आठवणही करुन दिली. आता मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि बुमराहबरोबर एकत्र बसून मुक्तपणे चर्चा करावी असा सल्लाही श्रीकांत यांनी दिला.