T20 World Cup: टीम इंडियावर होणार कारवाई ? T20 विश्वचषक 2022 दरम्यान सुरु झाला हा वाद

T20 World Cup 2022: T20  वर्ल्ड कप 2022 च्या दरम्यान टीम इंडिया मोठ्या वादात सापडली आहे. भारत-बांग्लादेश यांच्यातील सामन्यावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने मोठे विधान केले आहे.

Updated: Nov 4, 2022, 08:17 AM IST
T20 World Cup: टीम इंडियावर होणार कारवाई ? T20 विश्वचषक 2022 दरम्यान सुरु झाला हा वाद   title=

India vs Bangladesh: T20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup 2022) अर्थात 2 नोव्हेंबर रोजी भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 5 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यापासून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याच्यावर 'फेक फिल्डिंग'चा आरोप होत आहे. याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या कारणाने निर्माण झाला होता  वाद 

बांग्लादेश संघाला 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर विराट कोहली याच्यावर 'फेक फिल्डिंग' आरोप करण्यात येत आहे. बांग्लादेश संघाच्या म्हणण्यानुसार, पंचांनी विराटच्या 'फेक फिल्डिंग'कडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी 'फेक फिल्डिंग'वर दंड म्हणून पाच अतिरिक्त धावा दिल्या गेल्यात. बांग्लादेशचा विकेटकीपर आणि फलंदाज नुरुल हसन याने सुरु केलेला हा वाद आता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. 

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सांगितली ही मोठी गोष्ट 

'फेक फिल्डिंग'च्या वादात खेळाडूंनंतर आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही उडी घेतली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीबीने गुरुवारी 3 नोव्हेंबर रोजी सांगितले की, पंचांनी त्यांच्या संघाच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही आणि आता ते हा मुद्दा उचलतील. ढाका येथे पत्रकारांशी बोलताना बांग्लादेश क्रिकेट ऑपरेशन्सचे प्रमुख जलाल युनूस म्हणाले की, कर्णधाराने पंचांचे लक्ष वेधले होते, पण त्यांचे ऐकले गेले नाही. शाकिबने इरास्मस (अंपायर मराय इरास्मस) यांच्याशीही याबद्दल खूप चर्चा केली आणि सामन्यानंतरही चर्चा केली. हा मुद्दा आमच्या मनात आहे जेणेकरुन आम्ही तो योग्य मंचावर (ICC) मांडू शकू.

या षटकात घडली ही घटना  

बांग्लादेश संघाच्या म्हणण्यानुसार, बांग्लादेशच्या धावसंख्येच्या 7 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लिटन दास स्ट्रायकरच्या दिशेन धावत असताना ही घटना घडली. त्यानंतर अर्शदीप सिंग याने झटपट चेंडू दिनेश कार्तिक याच्या दिशेने फेकला, त्याने चेंडू सुरक्षितपणे पकडला. मात्र, अर्शदीपचा थ्रो कार्तिकच्या दिशेने जात असताना कोहलीने थ्रोइंग अॅक्शन केली. त्यावेळी त्याच्याकडे चेंडूही गेला नव्हता.