श्रीलंकेला ३-०नं हरवलं तर कोहलीचं होणार हे रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं २-०ची विजयी आघाडी घेतली आहे.

Updated: Aug 9, 2017, 09:26 PM IST
श्रीलंकेला ३-०नं हरवलं तर कोहलीचं होणार हे रेकॉर्ड  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं २-०ची विजयी आघाडी घेतली आहे. या सीरिजची तिसरी टेस्ट १२ ऑगस्टपासून कॅन्डीमध्ये खेळवली जाईल. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं लागोपाठ ८ सीरिज जिंकल्या आहेत. तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा पुन्हा विजय झाला तर श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्याची संधी भारताला आहे. 

नियमीत कर्णधार झाल्यावर कोहलीनं २०१५मध्ये श्रीलंकेत पहिली सीरिज खेळली होती. या सीरिजपासूनच भारताचा लागोपाठ ८ सीरिज जिंकण्याचा सिलसिला सुरू झाला होता. ८५ वर्षांमध्ये फक्त एकदाच भारतानं परदेश दौऱ्यामध्ये तीन टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताला श्रीलंकेला ३-०नं हरवण्याची नामी संधी चालून आली आहे. 

मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाळी भारतानं १९६८मध्ये न्यूझीलंडविरुद्धची सीरिज ३-१नं जिंकली होती. या सीरिजमध्ये भारत ड्यूनेडिनमधली पहिली टेस्ट जिंकला होता तर क्राईस्टचर्चमधली दुसरी टेस्ट हारला होता. यानंतर वेलिंग्टन आणि ऑकलंडमधली मॅच जिंकत भारतानं इतिहास घडवला होता.