'विराटचं कौतुक करताय ते ठीक, पण त्यापेक्षा...,' पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान

एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुल यांनी केलेल्या 162 धावांच्या भागीदारीच्या आधारे भारताने ऑस्ट्रेलियाविरोधातील सामना जिंकत पहिल्या विजयाची नोंद केली.   

शिवराज यादव | Updated: Oct 10, 2023, 05:17 PM IST
'विराटचं कौतुक करताय ते ठीक, पण त्यापेक्षा...,' पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान

एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघासाठी विराट कोहली आणि के एल राहुल विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. 201 धावांचा पाठलाग करताना पहिल्या दोन ओव्हरमध्येच भारताचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. पण या स्थितीत विराट कोहली आणि के एल राहुल यांनी संयमी खेळत करत चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. या सामन्यात विराटने 85 तर के एल राहुलने नाबाद 97 धावा केल्या. सामन्यानंतर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर याने के एल राहुलचंही तितकंच कौतुक केलं पाहिजे असं म्हटलं आहे. के एल राहुलनेही दुसऱ्या बाजूला खेळताना विकेट जाऊ नयेत याची काळजी घेतली असल्याने त्याचंही तितकंच कौतुक करण्याची गरज असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

"के एल राहुलने ज्याप्रकारे आपला अधिकार प्रस्थापित केला, त्यावरून तो वेगळ्या लीगमध्ये असल्याचं दिसतं. विराट कोहलीने चांगली खेळी खेळली पण तो संधीरहित खेळी करु शकत नाही. याउलट के एल राहुल जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा त्याने संपूर्ण डावात एकही संधी दिली नाही," असं शोएबने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं.

ऑस्ट्रेलियाविरोधातील विजयानंतर अनेकजण विराट कोहलीचं कौतुक करत आहेत. विराट कोहलीने ज्याप्रकारे आपली खेळी उभी केली त्यावरुन त्याची पाठ थोपटली जात आहे. विराट कोहलीने संघ दबावात येणार नाही याकडे लक्ष देताना एक आणि दोन धावा घेण्यावर भर दिला होता. दरम्यान, शोएब अख्तरने विराट कोहलीसह भागीदारी करणाऱ्या के एल राहुलचा फिटनेसही चांगला होता, सांगताना त्याने शेवटच्या ओव्हरपर्यंत विकेट जाऊ दिला नसल्याकडे लक्ष वेधलं. 

"राहुलने जिथे गरज होती तिथे फटके लगावले. कठीण प्रसंगातही त्याने त्या स्थितीत स्वत:ला सामावून घेतलं. विराट कोहलीचा झेल सुटला तो नक्कीच मोठा टर्निंग पॉइंट होता. पण के एल राहुलने दिलेली स्थिरताही महत्त्वाची होती. त्याला तुम्ही पहिल्या किंवा इतर कोणत्याही क्रमांकावर खेळवलं तरी तो चांगलाच खेळतो. त्याने आपली विकेट जपून ठेवली हे विसरु नका," असं शोएख अख्तरने सांगितलं.

"विराट कोहलीचा फिटनेस आणि विकेटमधील धावांसाठी कौतुक केलं जात आहे. पण के एल राहुलही त्याच्यासह धावत होता, याशिवाय त्याने विकेटही जाऊ दिली नाही हेदेखील महत्त्वाचं आहे. के एल राहुल एक संपूर्ण खेळाडू असून त्याला पाठिंबा दिला पाहिजे," असं मत शोएब अख्तरने मांडलं आहे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More