तरुणींना मोफत The Kerala Story चित्रपट दाखवला, सिनेमागृहातच त्यांच्याकडून घेतली शपथ

'द काश्मीर फाईल्स'नंतर 'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादात सापडला. या चित्रपटाची कथा केरळची आहे. मात्र, याचा वाद देशभरात झाला.  महाराष्ट्रातही 'द केरला स्टोरी'चा वाद झाला. आता मात्र, हिंदू संघटना वेगळ्या पद्धतीने यावर आपली भूमिका मांडत आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 17, 2023, 04:52 PM IST
तरुणींना मोफत The Kerala Story चित्रपट दाखवला, सिनेमागृहातच त्यांच्याकडून घेतली शपथ  title=

The Kerala Story : विपुल अमृतलाल शाह यांचा सिनेमा ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  5 मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट चांगली कमाई करत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला केला आहे. द केरला स्टोरी हा सिनेमा रिलीज झाला आणि त्यावरुन वाद, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. केरळच्या या कथेचा देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात चांगलाच वाद पेटला. अशातच महाराष्ट्रातील कोल्हापुरच्या इचलकरंजी शहरामध्ये तरुणी आणि महिलांना हे चित्रपट मोफत दाखवून त्यांच्याकडून सिनेमागृहातच शपथ घेण्यात आली. 

कोण दाखवतयं हा चित्रपट मोफत?

इचलकरंजी शहरामध्ये विश्व हिंदू बजरंग दल आणि शिव प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू मुलीना मोफत द केरळा स्टोरी हा चित्रपट दाखविला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे चित्रपट पाहायला आलेल्या मुलींना थिएटर मध्ये चक्क शपथ दिली जात आहे. 

तरुणींकडून कोणती शपथ  घेतली? 

हिंदू धर्म कसा असावा, लव जिहाद पासून कसे लांब राहावे या संदर्भात तरुणींकडून शपथ घतेली जात आहे. तरुणी शपथ घेतानाचे व्हिडिओ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे नेमक इचलकरंजी शहरात काय सुरू आहे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

 'द केरळा स्टोरी सिनेमाच्या समर्थनार्थ बॅनर

पुण्याच्या भोरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी 'द केरळा स्टोरी सिनेमाच्या समर्थनार्थ बॅनर लावले होते. 'एक वेळ मुलींना केरळ दाखवले नाही तरी चालेल,पण द केरळा स्टोरी अवश्य दाखवा' अशा आशयाचे पोस्टर लावून सिनेमा पाहण्याचं आवाहन करण्यात आले 

का आहे 'द केरला स्टोरी' चित्रपटाचा वाद?

धर्म, लव्ह जिहाद, दहशतवाद, राजकारण आणि मसाला असा हा चित्रपटाचा कॉम्बोपॅक. हा सिनेमा सत्यकथेवर आधारित असल्याचा दावा केला जातोय. केरळमध्ये हजारो मुलींचं धर्मांतर करण्यात आलंय आणि त्यांना इसिसमध्ये ट्रेनिंग देऊन दहशतवादी केलं जातंय, असं चित्रपटाचं कथानक आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच वादात सापडला होता. केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या कारणावरुन या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. प्रदर्शनानंतर द केरला स्टोरी' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमावतोय.