चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारण

Shocking News: एकाच दिवशी त्या घरातील 13 जणांचा मृत्यू झाला. उपचारासाठी या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घरातील केवळ एक तरुणी वाचली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 8, 2024, 09:45 AM IST
चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारण title=
पोलीस तपासात समोर आलं सत्य (प्रातिनिधिक फोटो सौजन्य सोशल मीडिया आणि रॉयटर्सवरुन साभार)

Shocking News: प्रेम अंधळं असतं असं म्हणतात. अनेकदा प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बऱ्याचश्या गोष्टींवर मात मिळवून आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्य एकत्र जगण्यासाठी बराच त्याग करण्याची प्रेमी जोडप्यांची तयारी असते. प्रेमासाठी अगदी काहीही करण्यास प्रेमीयुगुलं तयार असतात. मात्र प्रेमात अंधळ्या झालेल्यांकडून कधीतरी कायदा हातात घेण्याचे प्रकारही घडला. अशावेळी आपण काय करतोय याचं भान राहत नाही आणि हातून मोठी चूक घडते. त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीच हाती उरत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कुठे घडला हा प्रकार

एका तरुणीने आपल्याच कुटुंबातील 13 जणांना विष चारुन त्यांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडत्या मुलाशी घरचे लग्न करुन देण्यास तयार नसल्याने या मुलीने घरातील जेवणामध्ये विष टाकून सर्वांना संपवल्याची माहिती समोर आली आहे. हा सारा प्रकार पाकिस्तानमधील सिंध प्रांतात घडला असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे.

एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरपूरजवळील हैबत खान बोरी गावामध्ये एकाच कुटुंबातील 13 सदस्य दगावल्याचा प्रकारस 19 ऑगस्ट रोजी घडला. या मुलीला आवडणाऱ्या मुलाशी लग्न करु देण्यास कुटुंबियांनी नकार दिल्याने ती कुटुंबावर प्रचंड संतापली होती. त्यामुळेच तिने तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या आई वडिलांसहीत घरातील सर्व सदस्यांना विष चारुन ठार करण्याचा कट रचला, असंही पोलिसांनी सांगितलं.

पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं सत्य

"जेवण केल्यानंतर घरातील 13 सदस्य आजारी पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित केलं गेलं. या मृतांचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं," अशी माहिती खैरपूरमधील पोलीस अधिकारी इनायत शाह यांनी दिली. पोस्टमॉर्टम अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी बचावलेल्या मुलीची कसून चौकशी केली.

चपातीच्या पिठात टाकलं विष

आपण त्या दिवशी जेवलो नव्हतो म्हणून आपल्याला काही झालं नाही असं या मुलीने आधी पोलिसांना सांगितलं. मात्र तिच्याबद्दलची माहिती गोळा केली असता तिचे कुटुंबातील सदस्यांबरोबर लग्नावरुन मतभेद असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी तिची आणि तिच्या प्रियकराची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मुलीने गुन्ह्याची कबुली देत प्रियकराच्या मदतीने आपणच घरच्यांना संपवल्याचं पोलिसांना सांगितलं. चपातीच्या पिठात विष घालून आपण सर्वांना संपवल्याचं तिने मान्य केलं.

प्रियकराने आणून दिलं विष

मुलीने 15 दिवसांनंतर गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिला रविवारी पोलिसांनी अटक केली. "अनेकदा प्रयत्न करुनही तिचे कुटुंबिय तिच्या आवडीच्या मुलाबरोबर तिचं लग्न लावून देत नसल्याने ती संतापली होती. तिने तिच्या प्रियकराच्या मदतीने घरात चपात्या करताना पिठामध्ये विष घालून घरतील सर्वांना ठार केलं," असं शाह यांनी सांगितलं. प्रियकराने या मुलीला विष आणून दिल्याची माहिती समोर आली आहे.