भारताची २ विमानं पाडली, एका वैमानिकाला अटक; पाकिस्तानचा दावा

भारताच्या हल्ल्याला आपण चोख प्रत्युत्र देऊ शकतो हे दाखवण्यासाठीच केली घुसखोरी, असा दावा करण्यात आला आहे

Updated: Feb 27, 2019, 12:48 PM IST
भारताची २ विमानं पाडली, एका वैमानिकाला अटक; पाकिस्तानचा दावा  title=

नवी दिल्ली : हवाई हद्द ओलांडत भारतीय सीमेत प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय वायुदलाने परतवून लावल्याची माहिती समोर येत नाही तोच, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. भारताच्या हल्ल्याला आपण चोख प्रत्युत्र देऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. शिवाय भारतीय वायुदलाच्या एका जवानाला अटक केल्याचंही पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला. 

सकाळी भारतीय वायुदलाकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडण्यात आल्याचं गफूर यांनी ट्विट करत स्पष्ट केलं. याच ट्विटमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या हवाईदलाकडून भारतीय वायुदलाच्या विमानांवर हल्ला केल्याचं नमूद केलं. भारताच्या दोन विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत निशाणा करत त्यातील एक विमान खाली पडच्याचं या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे एक विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडलं आणि दुसरं भारतीय हद्दीतील काश्मीरध्ये पडल्याचं सांगत पाकिस्तानच्या हद्दीत एका भारतीय वैमानिकाला अटक केल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये उदभवलेली परिस्थिती सध्या अतिशय तणावाच्या वळणावर आलेली असून, पाकिस्तानकडून वारंवार भारतीय वायुदलाचा हल्ला परतवून लावण्याची क्षमता आपल्या सैन्यात असल्याचा दावा करण्यात येत आहे. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पाकिस्तनच्या वायुदलाने नियंत्रण रेषेपलीकडे काही हल्ले केले असून, भारताच्या हल्ल्याचं उत्तर देत आत्मसंरक्षणाचा हक्क असल्याचंच या माध्यमातून आम्हाला दर्शवायचं होतं, असं MoFA प्रवक्ते मोहम्मद फैजल म्हणाले. 

सध्याच्या घडीला एकंदर तणावाची पररिस्थिती पाहता पाकिस्तानकडूनही आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद या विमानतळांवरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.