Video : 'आज आमची जहागिरी आहे'; छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा सगळा प्रकार घडला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 7, 2023, 02:12 PM IST
Video : 'आज आमची जहागिरी आहे'; छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा title=

Maharashtra Politics : राज्यात शिवसेनेच्या (Shiv Sena) फुटीनंतर ठाकरे गट (Thackeray Group) विरुद्ध शिंदे गट (Shinde Group)असा वाद सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन बैठकीत (DPDC meeting) मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी निधी मिळत नाही अशी तक्रार केल्यानंतर या बैठकीत एकच गोधळ उडाला. या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) आणि पालकमंत्री संदिपान भुमरे (sandipan bhumre) यांच्यात जोरदार राडा झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नसल्यामुळे अंबादास दानवे आक्रमक झाले होते. यावेळी संदिपान भुमरे आणि अंबादास दानवे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन बैठकी कोणत्या आमदारांना निधी देण्यात यावा याविषयी चर्चा सुरु होती. यावेळी ठाकरे गटाकडून आम्हाला निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. आमदार उदयसिंह राजपूत यांनी तक्रार करताच अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले. स्टेजवरच पालकमंत्री आणि दानवे यांच्यात वाद सुरु झाला. यावेळी अंबादास दानवे यांनी खुर्चीवरून उठत ठाकरे गटाच्या आमदारासोबत बाचाबाची केली. जवळपास पाच ते दहा मिनिट हा सगळा प्रकार सुरु होता. त्यानंतर अधिकांऱ्यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पाहायला मिळाला.

विरोधी पक्षातील आमदारांना निधी देण्यात येत नाही असा आरोप केल्यानंतर पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर तिघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यानंतर भर सभेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. याप्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

"कोणताही अन्याय  सहन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जिल्हा नियोजन मंडळ स्वतःची जहागिरी आहे अशा पद्धतीने पालकमंत्री वागत असतील तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. ही माझी एकट्याची नाही सत्ताधारी लोकांचीही हीच भूमिका होती. लोकसंख्येच्या निकषानुसार निधी वाटप होते," असे अंबादास दानवे म्हणाले.

"सगळ्या तालुक्याला सारखा निधी दिला. विरोधी पक्षाचे कामच ते आहे. विरोधी पक्षाने आवाज नाही वाढवलं तर त्यांना विरोधी पक्षनेता कोण बनवेल," असे संदिपान भुमरे म्हणाले.

पालकमंत्री आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत - संजय शिरसाट

या प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "प्रत्येकाला वाटतं की, आम्ही सत्तेत नसतानाही आम्हाला जास्त निधी मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो, त्या आमदाराला निश्चित जास्त निधी मिळतो, हा अलिखित नियम आहे. पूर्वी तुम्हाला जो निधी दिला जात होता, त्यामध्ये कुठेही कमी केली नाही. तरीही तुम्हाला आणखी वाढीव निधी कशाला पाहिजे? त्यामुळे पालकमंत्री आणि इतर सहकारी संबंधित आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही आक्रमक व्हाल आणि अंगावर जालं, तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही," असे संजय शिरसाट म्हणाले.