Kurla Bus Accident: 'या घटनेतील मृतांच्या...'; CM फडणवीसांनी मोठी घोषणा! जाहीर केला मदतनिधी

Kurla BEST Bus Accident CM Devendra Fadnavis Big Announcement: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर झालेल्या बेस्ट बसच्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 10, 2024, 11:39 AM IST
Kurla Bus Accident: 'या घटनेतील मृतांच्या...'; CM फडणवीसांनी मोठी घोषणा! जाहीर केला मदतनिधी
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Kurla BEST Bus Accident CM Devendra Fadnavis Big Announcement: कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघातामधील मृतांची संख्या 3 वरुन 6 वर पोहचली असून सोमवारी रात्री झालेल्या या अपघातामागील कारणांचा शोध घेतला आहे. असं असतानाच आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सरकारच्यावतीने या प्रकरणावर भाष्य करणारे पहिलेच नेते आहेत. एकीकडे विरोधकांकडून या विषयावरुन कठोर कारवाईची मागणी केली जात असतानाच मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहे. "कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे," अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.

नक्की वाचा >> Kurla Accident: BEST बसचालक दारु प्यायला होता? शिवसेना MLA ने सांगितलं सत्य; म्हणाला, 'घाबरुन त्याने..' 

मोठ्या मदतीची घोषणा

तसेच याच पोस्टमध्ये पुढे, "या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे," असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.

शरद पवार गटाचा सरकारवर निशाणा

शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. "कंत्राटी भरतीविरोधात आम्ही कायम आवाज उठवत आलोय, पण सत्तांध सरकारला याकडं लक्ष द्यायला वेळ नाही. अखेर मुंबईत बेस्टमधील याच कंत्राटी चालकाकडून झालेल्या अपघातात पाच निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आणि पंचवीसहून अधिक नागरिक जखमी झाले. कंत्राटी भरती केली नसती तर अनुभव नसलेल्या चालकाला बस चालवण्यास देण्याची वेळ आली नसती आणि असा भीषण अपघात होऊन त्यात पाच जणांचे जीव गेले नसते. त्यामुळं आतातरी सरकारने कंत्राटी भरतीचा हट्ट सोडून नियमित भरती करावी आणि प्रशिक्षित असलेल्या चालकांच्याच हाती स्टेअरिंग द्यावं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

नक्का पाहा >> Video: कुर्ल्यातील BEST BUS अपघाताचे CCTV फुटेज; अंगावर काटा आणणारी दृश्यं कॅमेरात कैद

आदित्य ठाकरेंनी केली चौकशीची मागणी

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, "कुर्ला पश्चिम आंबेडकर नगर रोड येथे भरधाव बेस्ट बसने धडक दिल्याने 20 जण जखमी झाल्याचे तसेच तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. जखमींना वेळेत उपचार मिळून लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! ह्या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी," अशी मागणी केली आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More