आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता? नक्की काय घडतंय वाचा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी धक्का बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे

Updated: Jul 7, 2022, 09:14 AM IST
आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता? नक्की काय घडतंय वाचा title=

मुंबई : Maharashtra Politics : शिवसेनेच्या एका खासदाराने पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची विनंती केल्यानंतर, पक्षाच्या एका बंडखोर आमदाराने दावा केला की 18 पैकी 12 खासदार लवकरच एकनाथ शिंदे गटातील असतील. त्यामुळे आमदारांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी धक्का बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

'शिंदे गट शिवसेनेचा स्वाभिमान स्थापित करेल' - गुलाबराव पाटील

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पत्रकारांशी बोलताना आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, शिंदे गट पक्षाचा अभिमान पुन्हा स्थापित करेल. पाटील हे यापूर्वीच्या महाविकास आघाडीसरकारमध्ये मंत्री होते. 
'आमचे (बंडखोर गट) 55 पैकी 40 आमदार आहेत आणि 18 पैकी 12 खासदार आमच्यासोबत येत आहेत.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहित एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा असे म्हटले. कारण मुर्मू हे आदिवासी आहेत आणि त्यांचे समाजात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे खासदारसुद्धा वेगळी भूमिका घेतात की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सध्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये खरी शिवसेना कोणाची याबाबत दावे प्रतिदावे सुरू आहेत.  महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे असणारे काही नेते शिंदे गटाच्या निशाण्यावर आहेत. 
 
औरंगाबाद जिल्ह्यातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कायम अवतीभोवती असणाऱ्या चार जणांच्या टोळक्यामुळे हे बंड झाल्याचा आरोप केला आहे.

वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे म्हणाले, "शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसैनिक खूश आहेत." घडलेल्या घडामोडींसाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना नव्हे तर त्यांच्या आजुबाजूच्या चार लोकांना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याच लोकांनी इतर सेना आमदार आणि मंत्र्यांना ठाकरेंपासून दूर केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.