अनुच्छेद ३७०नंतर ३७१ ही काढाल का? पवारांनी मोदींना डिवचलं

पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. 

Updated: Oct 14, 2019, 06:40 PM IST
अनुच्छेद ३७०नंतर ३७१ ही काढाल का? पवारांनी मोदींना डिवचलं title=
संग्रहित फोटो

औरंगाबाद : औरंगाबादच्या कन्नड मतदार संघात, संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. सध्याचे राज्यकर्ते लष्कराच्या शौर्याचेही श्रेय घेतात. इंदिरा गांधींच्या काळात अनेक कामं झाली, मात्र त्यांनी असं श्रेय कधी घेतलं नाही अशी टीका शरद पवारांनी केली. 

राज्यात अनेक प्रश्न आहेत आणि यांचं फक्त ३७० सुरू आहे, रात्री झोपेतही हे ३७० करत असतील, असा उपरोधिक टोलाही पवारांनी लगावला. ३७० हा प्रश्न नाहीच, प्रश्न शेतीमालाच्या भावाचा असल्याचंही ते म्हणाले.

अनुच्छेद ३७० काढून आम्ही चमत्कार केला असं राज्यकर्ते सांगतात, ३७० हटवले आता ३७१ चं काय? ते हटवून बाकी राज्यातही का अधिकार देत नाही? असेही पवार म्हणाले.

आम्ही पंतप्रधान पदाचा आदर करतो, पण त्या पदावर असणाऱ्या माणसानेही याची जाणीव ठेवावी असं पवार म्हणाले.  तुम्ही कितीही दडपशाही केली तरी आमचे विचार संपणार नाही, १५० वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना काँग्रेसने बाहेर केलं, काँग्रेस त्यांना घाबरला नाही तर यांना काय घाबरणार असा टोलाही त्यांनी लगावला.

पाच वर्षांपूर्वी अमित शाह माहीत होते का कुणाला? ते लोकशाहीत निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर समाजासाठी काम करणं गरजेचं आहे. पण हे राज्यकर्ते सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.