पावसाचा कहर! चंद्रपूरमध्ये तलाव फुटले; गावात पाणी घुसले

विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमुळे तलाव फुटले  आहेत.  

वनिता कांबळे | Updated: Jul 21, 2024, 06:32 PM IST
पावसाचा कहर! चंद्रपूरमध्ये तलाव फुटले; गावात पाणी घुसले title=

Chandrapur Rain New : विदर्भात पावसाचा कहर पहयाला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमुळे तलाव फुटले आहेत. तलाव फुटल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थितू निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड हाल झाले आहेत. तसेच घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्क भागात प्रशासनाचे मदतकार्य सुरु आहे.  

चंद्रपूरच्या चिचपल्लीत गावतलाव फुटल्याने 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरलंय. सलग 2 दिवस पाऊस झाल्याने तलावाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. आज पहाटे तलाव फुटून पाणी गावात शिरलं. घरातील सामानाचं, धान्याचं आणि संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं. यात ४० बक-याही दगावल्या आहेत.

चिचपल्लीसह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातल्या मालडोंगरी येथील तलाव फुटला आहे. यामुळे धानोली -पोहा गावात पुराचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यात गेले 2 दिवस संततधार पावसामुळे तलावाच्या पाण्यात मोठी वाढ झाली होती. तलाव फुटल्याने धानोली- पोहा गावातील किमान 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरले तर शेकडो हेक्टर जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. मालडोंगरी हे गाव उंचावर असल्याने तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या धानोली- पोहा गावात झपाट्याने पाणी शिरले. सध्या इथे प्रशासनाचे मदत कार्य सुरू आहे.

चंद्रपूरच्या पिंपळखुट गावालगतच्या रिसॉर्टमध्ये पुरामुळे अडकलेल्या कर्मचाऱ्यांची, आता सुखरूप सुटका करण्यात आली. अंधारी नदीला पूर आल्याने रेड अर्थ नामक रिसॉर्टमध्ये पाणी शिरलं होतं. पहाटे कर्मचारी अडकल्याची माहिती मिळताच, पोलीस बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं...दरम्यान अंधारी नदीतून धोकादायक प्रवास करत, पोलीस बचाव पथकाने कर्मचाऱ्यांची सुटका केली. 

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या पावसानं शहरालगतच्या ईरई धरणाचे 7 दरवाजे दीड मीटरने उघडलेत .. शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.  शहराच्या सखल भागातच धरणाच्या पाण्याचा फटका बसतोय, मनपाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातला मुक्ताई धबधबा ओसंडून वाहत आहे. याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने, वनविभागाने आता प्रवेशाला बंदी घातलीये...पर्यटकांनी या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन वनविभागाने केले आहे.