Maharashtra Politics : '...तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती', उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले 'फायनल जर...'

Uddhav Thackeray In nashik Sabha : राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड कप फायनलचा उदाहरणासाठी दुजोरा दिला.

सौरभ तळेकर | Updated: Jan 23, 2024, 08:16 PM IST
Maharashtra Politics : '...तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती', उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले 'फायनल जर...' title=
Uddhav Thackeray nashik Sabha

Uddhav Thackeray On World Cup Final : उद्धव ठाकरे यांच्या गटाचं नाशिक येथे (Nashik News) अधिवेशन सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशकात जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड कप फायनलचा उदाहरणासाठी दुजोरा दिला. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे, पण शंकराचार्यांना नाही. शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा, शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. राम मंदिर बनविण्यासाठी, ३७० कलम काढण्यासाठी, हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही प्रत्येकवेळी भाजपला पाठिंबा दिला. ईडी, सीबीआय, आयटी हे तुमचे घरगडी आमच्या निर्दोष शिवसैनिकांच्या घरावर धाडी घालतायत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं.

बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी... आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला आहे. हे सत्तेत असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ असेल तर खुर्ची सोडून द्या, आम्ही सक्षम आहोत. मोदीजी आता महाराष्ट्र फिरून घ्या, हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे. महाराष्ट्र्र संकटात असताना मोदीजी कुठे होते? आता फक्त मतांसाठी येत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय.

ज्यावेळी दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं, जा कुणालाही विचारा. तुम्ही देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करत आहात. मोदीजी, हे हिंदुत्व नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार म्हणून सुरत लुटली होती. मोदीजी महाराष्ट्र लुटत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात. महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आम्ही तुम्हाला ओरबडू देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. जर वर्ल्ड कप फायनलचा सामना अहमदाबादमध्ये झाला नसता तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती, असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी केलंय.

महाराष्ट्राने तुमचं काय पाप केलंय? संकटात ज्या महाराष्ट्राने तुम्हाला वाचवलं, त्या महाराष्ट्राच्या मुळावर का घाव घालताय? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. माझ्या माता-भगिनींचे आशीर्वाद आहेत, ही माझ्या शिवसेनेची घटना आहे. शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. ही संपत्ती मला वारस्याने मिळाली आहे, चोरून मिळालेली नाही. मला माझ्या महाराष्ट्राला जगवायचं आहे, टिकवायचं आहे. जे जे महाराष्ट्रावर चालून आले त्यांना कसं गाडून टाकलं, हा इतिहास मला लिहायचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.