देवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी असं साधलं अचूक राजकीय टायमिंग

महाविकासआघाडीचे नेते बैठकांमध्ये व्यस्त...

Updated: Nov 25, 2019, 06:45 PM IST
देवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी असं साधलं अचूक राजकीय टायमिंग title=

मुंबई : महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सोमवारी राज भवनावर जाऊन १६२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपाल कार्यालयाला सादर केलं. पण या पत्राला अंमळ उशीरच झाला. गेल्या आठवड्यात हे पत्र दिलं असतं तर कदाचित महाराष्ट्रातलं राजकीय चित्र वेगळं असतं.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल कार्यालयाला १६२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. या पत्रामध्ये राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या ५६ आमदारांच्या तर काँग्रेसच्या ४४ आमदारांच्या सह्या आहेत. इतर आणि अपक्ष मिळून ११ आमदारांनीही स्वाक्षऱ्या केल्यात. एकूण १६२ आमदारांच्या सह्या असलेलं पत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सादर केलं आहे.

अजित पवार, अण्णा बनसोडे आणि धर्मरावबाबा अत्राम या तिघा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्या पत्रात नाहीत. मात्र महाविकासआघाडीच्या या पत्राला भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. 

जेव्हा महाराष्ट्रात कुणाचंच सरकार नव्हतं, तेव्हा महाविकास आघाडीचे नेते बैठकांवर बैठका घेत बसले. त्यांनी एवढा विलंब लावला की, भाजपनं राजकीय डावपेच खेळत रातोरात देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेवर आणलं. हीच ती वेळ म्हणत महाविकासआघाडीचे नेते हातावर घड्याळ बांधून वेळ काढत बसले. आणि फडणवीस-अजित पवारांनी मात्र अचूक राजकीय टायमिंग साधलं.