मी सरकारला काही वेळ देणार, त्यानंतर धारेवर धरणार - फडणवीस

राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी काही वेळ देणार आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 10, 2019, 07:07 PM IST
मी सरकारला काही वेळ देणार, त्यानंतर धारेवर धरणार - फडणवीस title=

मुंबई : राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी काही वेळ देणार आहे. मात्र, त्यानंतर जनतेच्या विरोधातील निर्णय घेतले तर मी या सरकारला सोडणार नाही. त्यांना धारेवर धरणार आहे. माझी आक्रमकता ही पहिल्या दिवशी पाहिली आहे. त्यामुळे मी या सरकारला जाब विचारणार आहे. पण काही काळ देणार आहे, त्यानंतर त्यांना तो वेळ मिळणार नाही. आक्रमकता हा माझा पिंड आहे. त्यामुळे धारेवर धरले जाईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार माझ्याकडे आले - फडणवीस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवे महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार आले. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. राजकीय सत्तासंघर्षानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी घेतली. या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी सर्वबाबींवर भाष्य केले. सध्या राज्यात नवीन सरकार आहे. तसेच माझे मित्र आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, थोडा वेळ हवा आहे. त्यामुळे मी या नव्या सरकारला काही वेळ देणार आहे. त्यांनी चांगले निर्णय घेतले तर त्याचे स्वागत असेल. मात्र, जर त्यांनी चुकीचे निर्णय घेतले तर मी त्यांच्यावर टीका जरुर करणार. या सरकारला धारेवरही धरणार, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आधीच्या सरकारच्या निर्णयाचा फेरआढावा घेण्याचा त्यांना अधिकार आहे. तो सरकारचा अधिकार आहे. तो त्यांनी घ्यावा. मात्र, जे विकासासाठी निर्णय घेतले आहेत. ते जर रद्द केले तर अनेक बाबींवर याचा थेट परिणाम होणार आहे. ते तसे काही करणार नाही, याची मला खात्री आहे. मात्र, सध्या जे चित्र उभे केले जात आहे, ते चुकीचे आहे. आज राज्याला अर्धा टक्क्यांनी कर्ज मिळाले आहे. एवढ्या कमी किमतीत कर्ज मिळणार आहे का? त्यामुळे एखादा प्रकल्प रद्द करणे म्हणजे मागे घेवून जाणे होय. आर्थिक दृष्टी मेट्रो प्रकल्प नवी दिशा देणारा आहे. यावर अनेक छोटे-मोठे उद्योग अवलंबून आहेत. त्यामुळे ते प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

सत्तासंघर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत

देवेंद्र फडणवीस मुलाखत ठळकबाबी -

- मी अजित पवार  (Ajit Pawar) यांच्याकडे गेलो नव्हतो. तेच आमच्याकडे आलेत. अजित पवार यांनी मला सांगितले की, आम्ही शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेससमवेत (Congress) तीन पक्षांचे सरकार चालवू शकत नाही. आणि म्हणूनच आपण एकत्रितपणे सरकार स्थापन केले पाहिजे. शरद पवार यांनी सरकार स्थापण्यासाठी सर्व काही केले आहे, असेही मला अजितदादांनी सांगितले. आणि काकांची परवानगी आहे, असे ते म्हणालेत आणि म्हणून आम्ही एकत्र सरकार स्थापन केले. आता ते बरोबर की चूक हे नंतर निर्णय स्पष्ट होईल.

- राष्ट्रवादीचे (NCP)  अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधानांशी झालेल्या भेटीबद्दल जे  माध्यमांशी बोलत आहेत, त्याबाबत वेळ आल्यावर आम्ही त्यांना उत्तर देऊ.

- त्या रात्री अजित पवार स्वतःहून भाजपकडे आले होते आणि त्यांनी शरद पवारांना माहिती असल्याचे सांगितले. माझ्याबरोबर सरकार बनवण्यापूर्वी, अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य आमदारांनी माझे बोलणे करुन दिले होते. 

- भाजप (BJP) कधीही कोणाशीही डील करत नाही. जर आम्हीला डील करायचे होते तर आम्ही कोणत्यातही पक्षाशी करुन अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावर सहमती दर्शविली असती. मग आम्ही सरकार स्थापन केले असते.

- आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहे. त्यांची आणि माझी मैत्री कायम आहे. त्यांनी कुठे म्हटलेले नाही तसेच मीही काही बोललेलो नाही. मैत्रीचे संबध जसे होते तसे आहेत. आमच्यात कोणतीही भिंत उभी राहिलेली नाही.

- विकास कामे थांबली तर रोजगारही उपलब्ध होणार नाही. बुलेट ट्रेन (Bullet train) प्रकल्पात अत्यल्प व्याजदराने कर्ज मिळाले आहे. मला वाटत नाही की हे सरकार बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवेल, परंतु मला असे वाटते की अशा परिस्थितीत विकास कामे रद्द करण्याचे वातावरण निर्माण करणे हा चुकीचा संदेश दिला जात आहे.

- उद्धव ठाकरे सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ देत आहे. एक नवीन सरकार आहे, म्हणून आम्ही या सरकारला वेळ देऊ. परंतु वेळ दिल्यानंतरही जर सरकारने विकासकामे केली नाही तर आपण नक्कीच सरकारला धारेवर धरु. ठाकरे सरकार आंतरविरोधाने भरलेले असल्यामुळे फार काळ टिकणार नाही.

- भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही. ही मीडिया निर्मितीची बातमी आहे. आमच्या पक्षात ओबीसी आणि सर्व जातींच्या लोकांना समान प्रतिनिधित्व मिळाले आहे. पंतप्रधान मोदीजी हे देखील ओबीसी जातीचे आहेत. देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी आहेत, त्यामुळे ओबीसी नेत्यांवर अन्याय होण्याचा प्रश्नच नाही.

- हे सरकार किती दिवस चालणार हे माहीत नाही. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत, हा मोठा विरोधाभास आहे. राष्ट्रवादीचे कोणाशीही जमते. ते कुठेही जाऊ शकतात.