न्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवला, बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवून रोहित ब्रिगेडला पाजलं पाणी

IND VS NZ 1st Test :पहिला टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर  8 विकेट्सने विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकून 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. 

पूजा पवार | Updated: Oct 20, 2024, 12:32 PM IST
न्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवला, बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवून रोहित ब्रिगेडला पाजलं पाणी
(Photo Credit : Social Media)

IND VS NZ 1st Test :  भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे पार पडलेल्या पहिला टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर  8 विकेट्सने विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकून 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. यापूर्वी न्यूझीलंडने 1988 मध्ये भारतात टेस्ट सामना जिंकला होता. 

Add Zee News as a Preferred Source

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यांचायतील पहिला सामना हा 16 ते 20 ऑक्टोबर पर्यंत बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने फलंदाजी करून न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं होतं.  पाचव्या दिवशी फक्त 2 विकेट्स गमावून न्यूझीलंडने विजयासाठीचं आव्हान पूर्ण केलं. 

न्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवला: 

बंगळुरूमध्ये झालेल्या टेस्ट सामना जिंकून न्यूझीलंडने भारतात टीम इंडियाविरुद्ध 36 वर्षांनी विजय मिळवला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 60 टेस्ट सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 21 तर न्यूझीलंडने 13 टेस्ट सामन्यात विजय मिळवला. तर दोन्ही संघात 26 सामने अनिर्णित राहिले. न्यूझीलंडनं 1988 मध्ये भारतात शेवटचा टेस्ट सामना जिंकला होत, हा सामना 24 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 1988 दरम्यान मुंबईत खेळला गेला होता.  त्यानंतर पुढील 36 वर्षांत आजपर्यंत न्यूझीलंडनं भारतात 16 कसोटी सामने खेळले, पण त्यांना एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. मात्र आता बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवून न्यूझीलंडने त्यांचा  36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. 

भारताला 46 धावांवर केलं ऑल आउट : 

बंगळुरू येथील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे खराब झाला, यामुळे टॉस सुद्धा होऊ शकला नाही. गुरुवारी दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचाही निर्णय टीम इंडियासाठी अयोग्य ठरला. कारण पहिल्याच इनिंगमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला 46  धावांवर ऑल आउट केले. टीम इंडिया प्रथमच भारतात झालेल्या टेस्ट सामन्यात इतक्या कमी धावांवर ऑल आउट झाली होती. 

न्यूझीलंडने केला 402 धावांचा डोंगर : 

दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाचा गोलंदाजांना घाम फोडला. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 134 तर देवोन कॉनवे याने 91 धावा केल्या. तर टीम साऊथ (65) सह इतर फलंदाजांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने तब्बल 402 धावांचा डोंगर उभा केला. यात न्यूझीलंडने 356 धावांची आघाडी घेतली होती. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी टीम इंडियाने न्यूझीलंडची ही आघाडी मोडण्यासाठी मजबूत फलंदाजी केली आणि ते यात यशस्वी सुद्धा ठरले. यात टीम इंडियाकडून रोहित शर्माने 52, विराट कोहलीने 70 , सरफराज खानने 150, ऋषभ पंतने 99 तर यशस्वी जयस्वालने 35 धावा करून न्यूझीलंडची आघाडी मोडीत काढली आणि न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले. 

हेही वाचा : VIDEO : रोहित शर्मा IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार? चाहत्याने विचारला प्रश्न, हिटमॅननेही दिलं थेट उत्तर

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके

 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More