लाजिरवाण्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर उपस्थित केले प्रश्न, शुभमन आणि पंतचं केलं कौतुक

आधी बंगळुरू, मग पुणे आणि रविवारी मुंबईत झालेल्या टेस्ट सामन्यातही टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभवच झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

पूजा पवार | Updated: Nov 3, 2024, 08:26 PM IST
लाजिरवाण्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर उपस्थित केले प्रश्न, शुभमन आणि पंतचं केलं कौतुक
(Photo Credit : Social Media)

IND VS NZ Test : न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 3-0 ने लाजिरवाणा पराभव झाला. तब्बल 24 वर्षांनी भारताला विरुद्ध संघाने घरच्या मैदानावर खेळलेल्या टेस्ट सीरिजमध्ये व्हाईट वॉश दिला. आधी बंगळुरू, मग पुणे आणि रविवारी मुंबईत झालेल्या टेस्ट सामन्यातही टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभवच झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने 25 धावांनी विजय मिळवला. भारताला विजयासाठी सोपं आव्हान मिळालं होतं मात्र शेवटच्या सामन्यातही टीम इंडिया हे आव्हान पूर्ण करून भारताकडे विजय खेचून आणू शकली नाही. न्यूझीलंडकडून टेस्ट सीरिजमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमधलं अव्वल स्थान देखील गमावलं. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलिया प्रथम स्थानी तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आली आहे. 

काय म्हणाला सचिन तेंडुलकर? 

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या टेस्टनंतर सचिन तेंडुलकरने ट्विट केले की, 'घरच्या मैदानावर 3-0 ने पराभव सहज पचवण्या सारखा नाही. ही आत्मनिरीक्षण करण्याची वेळ आहे. ही तयारीची कमतरता होती का?, की खराब शॉटचे सिलेक्शन किंवा सरावाची कमतरता? शुभमन गिलने पहिल्या डावात लवचिकता दाखवली आणि ऋषभ पंतने दोन्ही इनिंगमध्ये कमाल प्रदर्शन केले. संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरीचे संपूर्ण श्रेय न्यूझीलंडला जाते.  भारतामध्ये 3-0 असा विजय मिळवणे हा खूप चांगला परिणाम आहे'. 2000 साली खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 2-0 असा पराभव केला होता. आता 24 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतावर घरच्याच मैदानावर सीरिजमध्ये पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. 

WTC फायनलचं स्वप्न भंगणार? 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 2025 मध्ये होणार असून त्याकरता क्वालिफाय होण्यासाठी टीम इंडियाला 6 पैकी 4 सामने जिंकणं महत्वाचं होतं. यात न्यूझीलंड विरुद्ध एक आणि नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा समावेश होता. मात्र न्यूझीलंड विरुद्ध तिसरा टेस्ट सामना गमावल्यावर भारताला आता WTC फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 पैकी 4 सामने जिंकावे लागणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवलं भारतासाठी तेवढं सोपं नसेल. आतापर्यंत बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड इत्यादीं विरुद्ध झालेलया टेस्ट सीरिज या भारतात खेळल्या गेल्या. मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे. विदेशात टेस्ट सीरिज जिंकण्याचा टीम इंडियाचा इतिहास फार चांगला नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी भारताची कसोटी लागणार आहे. 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More