'ते खेळाडू खोटं बोलतात'

वर्ल्ड कपला आता जवळपास १६ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 19, 2018, 10:37 PM IST
'ते खेळाडू खोटं बोलतात' title=

मुंबई : वर्ल्ड कपला आता जवळपास १६ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. पण भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये कोण खेळणार याबाबत अजूनही निश्चित झालेलं नाही. याला भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर संधी म्हणून पाहतोय. वनडे टीममध्ये श्रेयस अय्यरला चार किंवा पाच नंबरवरचा बॅट्समन म्हणून पाहिलं जातंय. या स्थानासाठी अजिंक्य रहाणे, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना यांच्यामध्ये चुरस आहे. पण या सगळ्याचा मी तणाव घेत नसल्याचं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव वेगळा

बॅटिंगमध्ये सध्या असलेल्या स्पर्धेची मला चिंता नाही. माझं लक्ष्य फक्त स्वत:चा खेळ सुधरवण्यावर आहे. भरलेल्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव मी आयपीएलमध्ये घेतला आहे. पण हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे, इकडे खेळताना दबाव असतोच. जो खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दबाव वाटत नाही, असं म्हणतो तो खोटं बोलत असतो, असं वक्तव्य अय्यरनं केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेची खेळपट्टी जलद

मागच्या वर्षी ए टीमकडून अय्यर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात अय्यरची कामगिरी चांगली झाली होती. पण या सीरिजमधली खेळपट्टी ए टीमसाठी मिळालेल्या खेळपट्टीपेक्षा जलद होती, अशी प्रतिक्रिया अय्यरनं दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडेमध्ये अय्यरला बॅटिंगची संधी मिळाली. या मॅचमध्ये अय्यर १८ आणि ३० रन्स करुन आऊट झाला.