रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र

Geoglyphs In Konkan: रत्नागिरीतील देऊडमध्ये सापडलेली कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 13, 2024, 10:06 AM IST
रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र title=
Ancient Maharashtra rock art in ratnagiri declared protected monument

Geoglyphs In Konkan: कोकणात अनेक ऐतिहासिक स्थानं आहेत. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जातात. कोकणातील अनेक भागात कातळशिल्प मोठ्या प्रमाणात आढळतात. अश्मयुगीन काळातील ही काताळशिल्प म्हणजे जणू गुढच आहे. इतिहासपूर्व काळातील मानवी संस्कृतीच्या या पाउलखुणा आहेत. कोकणातील कातळशिल्प ही संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यात आता आणखी एका कातळशिल्पाची भर पडली आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देउड कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 

रत्नागिरीसह राजापूर तालुक्यातील अश्मयुगीन कातळशिल्प आढळून आली आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनायाच्यामार्फत कातळशिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गंत कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले जात आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील देउड येथे प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळशिल्प आढळून आले होते. हे कोरलेले मध्याश्मयुगीन कातळशिल्प आहे. या कातळावर एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरिण आणि इतर पावलांचे ठसे रेखाटण्यात आले आहे. एकूण 10 बाय 10 चौरस मीटर असे एकूण 100 चौरस मीटर इतके आहेत. कातळशिल्प परिसरातील 310 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. रत्नागिरीत देउड येथे सापडेले काताळशिल्प हे मध्यमपाषाण युगातील आहेत म्हणजेच जवळपास 20,000 ते 10,000 वर्षांपूर्वीचे आहेत. 

महाराष्ट्र व गोव्याजवळ 900 किमी क्षेत्रावर हे कातळशिल्प पसरले आहेत. फक्त रत्नागिरीतच 70 ठिकाणी 1,500 हून अधिक अशा कलाकृती आहेत. ज्यातील सात कलाकृतींना युनेस्कोने संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली आहे. कोकणातील ही कातळशिल्पे अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास १७० किमी लांब आणि २५ किमी रुंद पट्ट्यात आढळली आहेत