"मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा" बीडच्या लेकीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आपल्या कष्टकरी बापाची व्यथा आणि त्याच्यासोबत झालेली पिळवणूकीची हकीकत सांगणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय.   

Updated: Sep 29, 2022, 11:39 PM IST
"मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा" बीडच्या लेकीचं मुख्यमंत्र्यांना पत्र title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : लेकीच कल्याण होतंय म्हणून बापाने सावकाराकडून (Money Lender) साडे 8 लाख रुपये 4 टक्क्याने घेतले. त्याला 32 लाखाच्या जमिनिचे तात्पुरते खरेदीखत करुन दिले. मात्र सावकाराचे पैसे परत करुनही त्यांने परस्पर फेर ओढत जमिन हडप केली. इकडे 10 दिवसातच लेकीलाही परत पाठवले. त्यामुळे जमिनही हडप केली. अन् लग्न होवूनही लेक घरीच असल्याने माझा बाप चिंतेच आहे. तो आत्महत्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना वाचवा आणि आम्हाला आमची जमिन परत मिळून द्या, असं पत्र शेतकऱ्याच्या मुलीने (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुलीने लिहिलं आहे. (give us back our land  and save my father life beed young woman wrote letter to cm eknath shinde)

हे धक्कादायक वास्तव मांडणारं पत्र लेकिनं थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. आपल्या कष्टकरी बापाची व्यथा आणि त्याच्यासोबत झालेली पिळवणूकीची हकीकत सांगणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. मुलीच्या भावना नेमक्या काय आहेत,  हे पत्र वाचल्यानंतर स्पष्ट होतं. पुजा शेखर सावंत (वय 24 वर्षे, रा.कुप्पा, ता.वडवणी. ह.मु. पुनंदगाव ता.माजलगाव जि.बीड) या विवाहित तरुणीने मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलंय. 

पत्रात काय म्हटलंय?

"माझे शिक्षण सुरु असल्याने आणि नोकरी न लागल्याने आई-वडिलांनी माझे लग्न करण्याचे ठरवलं. लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून घरचेचे नकार देत होते. मात्र त्यानंतर आमच्या गावातील खासगी सावकारनेच स्थळ आणले. अन् मी देतो पैसे करा लग्न. वडिल म्हणाले. मुलगा चांगला आहे. तर पैसे ठीक आहे. सावकाराने आम्हाला 8 लाख 50 हजार दिले. लग्न काही दिवसांवर आलं. सावकराने पैसे चार रुपये टक्क्याने राहुद्या नसता मला दोन एक्कर जमिन नावची करुन द्या. लग्न जवळ आल्याने आमच्या समोर कोणताही पर्याय नव्हता. म्हणून त्यांना आम्ही 2 एक्कर जमीनीचे खरेदी खत तात्पुरते करुन दिले. नंतर माझे लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर त्यांनी मला 10 दिवसात हाकलून दिले. वडिलांनी सावकाराचे पैसे परत करुनही जमिन परत दिली नाही. माझे लग्न लावून दिले. तरी मी घरीच आहे. त्यामुळे माझे वडिल खूप खचले असून त्यांनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आम्हीच त्यांना कसा तरी धीर देत आहोत. मात्र आता माझाही संयम तुटतोय. मोठं होवून जगण्यापेक्षा अगोरदरच मेले असते तर आई-वडिलांपुढे एवढे संकट उभे राहिले नसतं. आमचे वडिल जिवंत आहेत तोपर्यंत आमची जमिन आम्हाला परत मिळून द्या" असं पत्र लिहत या तरुणीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

राज्यात दसरा मेळावावरून राजकारण ढवळून निघालेय. त्यात बीड जिल्ह्यातील या लेकीनं बापाची व्यथा मांडणारं पत्र सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. किमान या पत्रानंतर तरी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचल ही अपेक्षा घेऊन जणू या तरुणीने पत्र लिहिण्याचे यातून स्पष्ट होतंय.