उद्धव ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही त्याच खेळपट्टीवर फलंदाजी

भविष्यात शिवसेनेवरुन शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

Updated: Jul 4, 2022, 08:15 PM IST
उद्धव ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही त्याच खेळपट्टीवर फलंदाजी title=

मुंबई : आपल्या हातून सत्ता गेल्यानंतर आणि पक्षावरचं संकट लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना भावनिक साद घालताना दिसले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला, विशेषत: शिवसैनिकांना या पदाची कसलीही ओढ नसल्याचा सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ते म्हणाले की, मी सुरुवातीला मुख्यमंत्रीपदासाठी तयार नव्हतो. पण नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून ते मान्य केले. 

सरकार जाणार आहे पण समोरचे संकट यापेक्षा मोठे आहे हे उद्धव ठाकरेंना माहीत होते. हे लक्षात घेऊन ते भावनिक आवाहन करत होते. ज्या खेळपट्टीवर उद्धव आतापर्यंत फलंदाजी करत होते, त्याच खेळपट्टीवर आज एकनाथ शिंदेही फलंदाजी करताना दिसले.

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक

महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवत आम्ही शिवसैनिक असल्याचे सांगितले. आम्ही शिवसैनिक आहोत आणि सदैव बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे शिवसैनिक राहू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत फ्लोअर टेस्ट जिंकली. 288 सदस्यांच्या सभागृहात 164 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर 99 आमदारांनी विरोधात मतदान केले. 

फ्लोअर टेस्टपूर्वी, ठाकरे गटामधील आणखी एक शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांची संख्या 40 झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी मला अन्यायाविरुद्ध लढण्याचा धडा दिला होता, त्यानुसार मी माझ्या ध्येयावर पुढे निघालो. एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांना मतदानावर 6 वर्षे बंदी घातली ते कोण होते, याची आठवण करून द्यावीशी वाटते.

विश्वासदर्शक ठरावानंतर आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, मी माझ्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकलो नाही. माझी दोन मुले गेल्यानंतर आनंद दिघे यांनी माझे सांत्वन करून मला आधार दिला. मला वाटायचे, जगण्यासारखे आता काय आहे. मुलांची आठवण करून त्यांचे डोळे भरून आले. सुमारे 22 वर्षे जुनी घटना आठवून ते भावूक झाले. मुलगा दिपेश आणि मुलगी शुभदा यांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता.

उद्धव ठाकरेंची खुर्ची गेली आणि आता महाराष्ट्रात शिवसेनेवरुन संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. त्यांच्यासोबत बहुतांश आमदार आधीच सामील झाले आहेत. त्याचवेळी आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडखोरी करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या काही खासदारांनी आधीच बंडखोरीचा मूड तयार केला आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांनी पक्षापासून फारकत घेतली, तर एकनाथ शिंदे यांचा पक्षावरील दावा बळकट होऊ शकतो. ही लढत दीर्घकाळ होणार हे सर्वांना माहीत असले तरी हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही जास्तीत जास्त शिवसैनिकांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत.