‘निजामुद्दीनमधील मरकजचा कार्यक्रम टाळता आला असता’

शरद पवार यांची प्रतिक्रिया

Updated: Apr 2, 2020, 02:04 PM IST
‘निजामुद्दीनमधील मरकजचा कार्यक्रम टाळता आला असता’ title=

मुंबई : दिल्लीत निजामुद्दीनमध्ये आयोजित केलेला मरकज कार्यक्रमाचा देशभरात परिणाम झाला आहे. हा कार्यक्रम टाळता आला असता, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निजामुद्दीन प्रकरणावर आपलं मत मांडलं.

दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये तबलीग ए जमात या मुस्लीम संघटनेच्या मरकज या धार्मिक कार्यक्रमात हजारो लोक एकत्र आले आणि त्यातून कोरोना व्हायरसची अनेकांना लागण झाली. हे लोक देशभरात गेले असल्यानं कोरोनाचा फैलाव वेगवेगळ्या ठिकाणी झाला. शरद पवार यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना निजामुद्दीनच्या कार्यक्रमावर भाष्य केलं.

 “दिल्लीत मरकजचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. राज्यातलेही अनेकजण त्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रमानंतर त्यातील काही लोक इतरत्र गेले. त्यातील काही लोकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी एकत्र प्रवास केल्याचं नाकारता येत नाही. आता करोनाचा आजार वाढत आहे. आजची स्थिती पाहता आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता,” असं शरद पवार यावेळी म्हणाले. मुस्लिम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी, असं आवाहन पवार यांनी केलं.

सरकारच्या सूचना पाळा

“करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक पावलं उचलण्यात आली. परंतु त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे असं दिसतंय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहेत,” असं पवार यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना सरकारनं दिलेल्या सुचनांचं पालन करण्याची विनंती पवार यांनी केली.

<p><iframe allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560"></iframe></p>

“९० टक्के लोक सूचनांचं पालन करतायत पण १० टक्के लोकांकडून ते होत नाही. सर्वांनी नियम पाळून सरकारला सहकार्य करावं. लोकं आजही मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. आपल्याकडे भाजीपाल्याची कमतरता नाही. सर्व उपायययोजना असताना त्या मिळणार नाही अशा भावनेनं लोकांनी गर्दी करू नये. सरकारनं ज्या काही सुचना दिल्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा आहे,” असं पवार म्हणाले.