१६० कोटी द्या नाहीतर... आयसीसीची बीसीसीआयला धमकी

आयसीसीने बीसीसीआयला कररुपात भरलेल्या 160 कोटीची रकम परत करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे.   

Updated: Dec 22, 2018, 01:38 PM IST
 १६० कोटी द्या नाहीतर... आयसीसीची बीसीसीआयला धमकी title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यात खडांजगी झाली आहे. 2016 साली भारतात झालेल्या टी-20 वर्ल्डकपचा एकूण 160 कोटी कराचा भरणा हा आयसीसीने केला होता. आता त्या रकमेचा परतावा बीसीसीआयने 31 डिसेंबरपर्यंत करावा. अन्यथा 2021 साली भारतात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद का़ढून घेऊ, अशी धमकीच आयसीसीने बीसीसीआयला दिली आहे.  

प्रकरण काय आहे

2016 ला टी-20  वर्ल्डकपचं आयोजन भारतामध्ये करण्यात आले होते. या वर्ल्डकप विश्वचषकावर झालेल्या एकूण खर्चावरी 160 कोटींचा कराचा भरणा हा बीसीसीआयने करणे अपेक्षित होते. पण त्या कराचा भरणा आयसीसीने केला होता. त्यावेळी आयसीसीने राज्य-केंद्र सरकारकडे करमाफी करण्यासाठी विनंती केली होती. पण ती मंजूर करण्यात आली नाही. या वर्ल्डकपच्या आयोजनाची सर्वस्वी जबाबदारी ही बीसीसीआयची होती. तरीदेखील या कराचा भरणा आयसीसीने केला होता. आता आयसीसीने या करस्वरुपात भरलेल्या रकमेचा परतावा करण्यासाठी बीसीसीआयला 31 डिसेंबरपर्यंत भरण्याची मुदत दिली आहे.

तर यजमानपद रद्द

 जर 160 कोटी परतवले नाही तर,  2021 ला होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी आणि 2023 ला होणाऱ्या ५० षटकांच्या वर्ल्डकपचे आयोजन भारतात करु देणार नाही, अशी धमकी आयसीसीकडून देण्यात आली आहे. तसेच या स्पर्धांसाठी अन्य पर्यायांचा विचार केला जाईल, असे आयसीसीकडून सांगण्यात आले. बीसीसीआयला अनेक मार्गांनी उत्पन्न मिळते. जर बीसीसआयने कर स्वरुपात भरलेल्या रक्कमेचा परतावा केला नाही तर, या वर्षाच्या उत्पन्नातून ती रक्कम वसूल करु, असे खडेबोल देखील आयसीसीने सुनावले आहे. 

आयसीसीने अशा आक्रमक भूमिकेमूळे बीसीसीआयच्या पायखालची जमीन सरकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमणूक केलेले दहा जणांचे शिष्टमंडळ यावर चर्चा करत आहे. ऑक्टोबर महिन्यात सिंगापूरमध्ये आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत 160 कोटी रक्क्म परत करण्यासंदर्भात बीसीसीआय सकारात्मक होती. असे आयसीसीचं म्हणणे आहे. या बैठकीत ज्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्या मुद्द्यांच्या अहवालाची मागणी बीसीसीआयने आयसीसीकडे केली. पण तो अहवाल आयसीसीने दिला नाही. या 160 कोटी रकमेबद्दल आयसीसीने कोणत्याच बैठकीत हा मु्द्दा चर्चिला नाही. त्यामुळेच या बैठकीचा अहवाल आयसीसी देत नसल्याची भूमिका बीसीसीआयने मांडली.

आयसीसीने बीसीसीआयला कररुपात भरलेल्या 160 कोटीची रकम परत करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. बीसीसीआयकडे फक्त 9 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बीसीसीआय काय पाऊल उचलणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.