T 20 वर्ल्ड कपमधून OUT होताच पाकिस्तान्यांकडून टीम इंडियाची फिरकी

टीम इंडियाचं (Team India) टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) आव्हान संपुष्टात आलं आहे.

Updated: Nov 8, 2021, 04:26 PM IST
T 20 वर्ल्ड कपमधून OUT होताच पाकिस्तान्यांकडून टीम इंडियाची फिरकी title=

यूएई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 मधील 40 वा साखळी सामना न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तावर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. तर अफगाणिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धेतून बाहेर पडल्याने भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. टीम इंडियावर विशेष करुन पाकिस्तानमध्ये टीका केली जात आहे. विविध मीम्सच्या माध्यमातून टीम इंडियावर निशाणा साधला जात आहे. तसेच फिरकीही घेतली जात आहे. (Pakistanis critisized after team India is out of the T20 World Cup 2021)

पाकिस्तानी मंत्र्याकडून ट्विटद्वारे टीका

पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी टीम इंडियावर ट्विटद्वारे टीका केली आहे. "टीम इंडियाने नामिबिया विरुद्ध होणारा सामना 3 ओव्हरमध्ये जिंकला तर एयरपोर्टवर लवकर पोहचू शकते", असं खोचक ट्विट केलं आहे.

इट्स ए रहमान नावाच्या एका युझर्सने ट्विट केलंय. यामध्ये त्याने उपरोधिक टीका केली आहे. "टीम इंडियाने मुंबईसाठी यशस्वीरित्या क्वालिफाय केलं आहे. तर अफगाणिस्तानने काबुल विमानतळासाठी पात्र ठरले आहे."

रविवारी 7 नोव्हेंबरला झालेल्या सामन्यावर टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कपमधील भवितव्य आधारित होतं. अफगाणिस्तानने सामना जिंकला असता तर टीम इंडियाचे सेमी फायनलसाठीचं मार्ग काहीसा सोपा झाला असता. त्यामुळे अफगाणिस्तानच्या कामगिरीवर टीम इंडियाची लक्ष होतं.

अफगाणिस्तानने जिंकावं, अशीच प्रत्येक भारतीयाची इच्छा होती. पण ज्याची भिती होती, तेच झालं. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभ केला. यावरुन राहिल भट्टने निशाणा साधला आहे. "आपला सामना स्वत:च जिंकावा",असं ट्विट केलं आहे.

आयसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभूत

टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील मोहिमेची सुरुवात ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने झाली. टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केलं होतं. मात्र यावेळेस मोठा उलटफेर झाला. पाकिस्तानने टीम इंडियाला 10 विकेट्सने पराभूत करत दणदणीत विजय मिळवला.  

सेमी फायनलच्या टीम ठरल्या

दरम्यान ए आणि बी अशा दोन्ही ग्रृपमधून आता एकूण ४ संघांनी सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. यामध्ये ग्रृप ए मधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पोहचली आहे. तर बी ग्रृपमधून पाकिस्तान आणि न्यूझीलंडने प्रवेश मिळवला आहे.

सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. यानंतर 14  नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.